कराड (प्रतिनिधी) – पाडळी (हेळगाव, ता. कराड) येथे शेततळ्यात पोहायला गेलेल्या महिलेसह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. आज मंगळवार दि. 16 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शेततळ्यात दोरीच्या सहाय्याने पोहताना दोरी तुटून ही दुर्घटना घडली. यामध्ये पोहायला येत असणाऱ्यांनी बाकीच्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सहा जणांना वाचवण्यात त्यांना यश आले. परंतु, एका महिलेसह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला.
शोभा नितीन घोडके (वय 35), रागिणी रामचंद्र खडतरे (वय 8) व वैष्णवी गणेश खडतरे (वय 15) यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाडळी (हेळगाव) येथे एका शेतकऱ्याच्या शेतावर शेतमजुरी करणारे कुटुंब वास्तव्यास आले. डोंगरालगत असलेल्या या शेतात पाण्यासाठी मोठे शेततळे बांधण्यात आले आहे. या शेततळ्यावर शेतमजुरांसह काही जण पोहण्यासाठी जातात. याठिकाणी शेततळ्यात काहींनी पोहताना आधारासाठी दोरी बांधली होती.
आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शेततळ्यावर पोहण्यासाठी सुमारे दहा जण गेले होते. यावेळी ज्यांना पोहता येत नाही, असे दोरीचा आधार घेत पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यादरम्यान दोरीला जास्त जणांनी एकाच वेळी पकडल्याने दोरीवर अतिरिक्त ताण येवून दोरी तुटली. त्यामुळे दोरीचा आधार घेतलेले सर्व जण पाण्यात बुडू लागले. ही बाब शेततळ्यात पोहणाऱ्या बाकी जणांच्या लक्षात येताच त्यांनी बुडणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये सहा जणांना वाचवण्यात त्यांना यश आले. परंतु, एका महिलेसह अन्य दोन मुली शेततळ्यातील पाण्यात बुडाल्या. त्यांनाही तात्काळ पाण्याबाहेर काढून उपचारासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेने पाडळी (हेळगाव) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.