पुणे – 50 लाखांच्या खंडणीसाठी मार्केटयार्ड येथून तिघांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही तासांत श्रीगोंदा येथून तिघांना ताब्यात घेतले. तर अपहरण झालेल्या व्यक्तींची सुटका करण्यात आली. प्रवीण शिर्के, विजय खराडे आणि विशाल मदने (रा. तिघेही नगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचे इतर साथीदार फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ मुंबईतील परंतु पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या ठेकेदारासह त्याच्या दोन साथीदारांचे आरोपींनी गुरुवारी दुपारी अपहरण केले. यानंतर आरोपींनी अपहरण करण्यात आलेल्यांपैकी एका व्यक्तीच्या भावाशी संपर्क केला. तिघांना सोडवायचे असल्यास पुण्यातील एम. जी. रस्ता येथील एका अंगडीयाकडे 50 लाख रुपये देण्याची मागणी केली.
घाबरलेल्या भावाने शुक्रवारी सकाळी मार्केटयार्ड पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली होती. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथकांच्या माध्यमातून करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.
पोलिसांनी तांत्रिक तपासावरून आरोपींचा माग काढण्यास सुरवात केली. सीसीटीव्ही आणि इतर माहितीवरून आरोपी हे श्रीगोंदा येथे असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. यानुसार पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने श्रीगोंदा येथील एका लॉजमधून तिघांना ताब्यात घेतले.
यावेळी काही आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींच्या ताब्यातून एक फॉर्च्यूनर आणि एक क्रेटा अशा दोन चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे, नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर, क्रांतीकुमार पाटील, अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.