- आढावा बैठकीला गैरहजर नगरसेवकांची यादी पाठवा
पिंपरी – राज्यातील सत्ता गेली आहे. त्यामुळे आता यांचे काही खरं नाही, असे म्हणून जर नगरसेवक आढावा बैठकीला येत नसतील तर त्यांना सांगतो गेलेली सत्ता कधीही येऊ शकते. प्रत्येकाचा टाइम कधीही बदलू शकतो, असे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गैरहजर नगरसेवकांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच गैरहजर नगरसेवकांचा यादी पाठवा, अशी सूचना पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित काळेवाडीत सभासद नोंदणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, महिलांच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे, शहर महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर संजोग वाघेरे, प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, फजल शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष श्याम लांडे, चिंचवडचे अध्यक्ष विनोद नढे, भोसरीचे पंकज भालेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, शमीम पठाण, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप आदी उपस्थित होते.
प्रत्येकाचा टाइम कधीबी बदलू शकतो
आढावा बैठकीला किती नगरसेवक उपस्थित आहेत, अशी विचारणा करून पाटील यांनी नगरसेवकांची हजेरी घेतली. तर बोटांवर मोजण्या एवढे नगरसेवक उपस्थित असल्याने प्रदेशाध्यक्ष पाटील चिडले. ते म्हणाले, राज्यातील सत्ता गेल्यामुळे जर नगरसेवक बैठकांना हजेरी लावत नसतील तर प्रत्येकाचा टाइम कधीबी बदलू शकतो. गेलेली सत्ता कधीही येऊ शकते. त्यामुळे गैरहजर नगरसेवकांना माझा निरोप पोहचवा. त्यांची यादी करून मला पाठवा, अशी सूचना शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना केली. तसेच प्रत्येक नगरसेवकाने 300 क्रियाशील सभासद नोंदणी करावी, असेही पाटील म्हणाले.