पुणे – “करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे आषाढी वारी होऊ शकली नाही. मात्र, यंदाचा सोहळा करोना निर्बंधमुक्त होणार आहे. आषाढी वारीसाठी 15 लाख भाविक पंढरपुरात जमतील अशी शक्यता आहे,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
विधान भवन येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थित पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख उपस्थित होते.
पवार म्हणाले, पालखी सोहळ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यांना सोहळा पूर्ण होईपर्यंत कार्यमुक्त करू नये. पंढरपूर येथे फिरते शौचालय आणि टॅंकर वाढवावेत. पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सूचना कराव्यात. पालखी मार्गावरील वाहतूक नियोजन करावे. आळंदीला वाहनतळासाठी जागा संपादन करावे. संत सोपानदेव पालखी मार्गावरील रस्त्यातील खड्डे जिल्हा परिषदेने त्वरित बुजवावे. पालखी मार्गावरील सोहळ्यासाठी कायमस्वरुपी जागा आरक्षित करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असेही पवार यांनी सांगितले.
लसीकरणाचे आवाहन
पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध रकरून देण्यात याव्यात. ज्या भाविकांनी करोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा किंवा वर्धक मात्रा घेतली नसेल त्यांना ती घेण्याबाबत आवाहन करावे, यासाठी लसीकरणाची सुविधा करण्यात यावी, असे आदेश पवार यांनी दिले.
आरोग्य व्यवस्थेवरही भर
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी पुणे जिल्ह्यात केलेल्या पूर्वतायरीची माहिती दिली. जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहे. पालखी मार्गावर महिलांसाठी 5 किमी अंतरावर शौचालय सुविधा करण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी 37 विहिरी आणि विंधनविहिरी अधिगृहित, 70 टॅंकरची व्यवस्था करण्यात आली आहे. 112 वैद्यकीय अधिकारी आणि 336 कर्मचाऱ्यांची पालखी मार्गावर नियुक्ती असेल. 23 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 87 फिरते वैद्यकीय पथक आणि 108 रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहे.