पिंपरी – वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध व्यवस्था आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देत असताना महापालिका पालखी सोहळ्याच्या आगमनाचे आणि मुक्कामाचे सुरेख नियोजन करणार आहे. तसेच महापालिकेने सुरू केलेल्या स्वच्छाग्रह मोहिमेला प्रतिसाद देत पर्यावरणाच्या दृष्टीने यंदाची वारी प्लॅस्टिकमुक्त निर्मलवारी होण्यासाठी वारकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.
यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त शनिवार (दि. 21) रोजी आयुक्त पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये नियोजन बैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त प्रा. डॉ. अभय टिळक, पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहायक आयुक्त रविकिरण घोडके विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालखी मार्गावरील राडारोडा उचलावा, खड्डे बुजवावे, मुक्काम, पालखी प्रवास आणि विसाव्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, फिरत्या शौचालयांची पुरेशी व्यवस्था करावी, मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आंघोळीची सोय असावी, सोहळ्यासाठी पुरेशी पोलीस सुरक्षा असावी, दिंड्यांच्या स्वागतासाठी घेण्यात येणाऱ्या भेटवस्तू ऐवजी वृक्षारोपण करावे, पालखी सोबत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन आदी सुविधा द्याव्यात, फिरत्या शौचालयांची व्यवस्था पुरवावी आदी सूचनांचा समावेश होता.
पालखी सोहळ्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांचे उत्तम सहकार्य मिळते. करोनानंतर दोन वर्षांनी यंदा अभूतपूर्व सोहळा होणार आहे. शिवाय मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक यात सहभागी होतील, अशी शक्यता असल्याने विविध सोयीसुविधा कमी पडू नये याची दक्षता प्रशासकीय यंत्रणेने घ्यावी असेही पालखी सोहळा पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर म्हणाले, पालखी सोहळ्यानिमित्त होणारी संभाव्य वारकऱ्यांची आणि भाविकांची संख्या विचारात घेऊन पोलीस यंत्रणेने कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेचे नियोजन केले आहे. अधिकची पोलीस कुमक बंदोबस्तासाठी तैनात केली जाणार आहे. जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आभार मानले.