नवी दिल्ली – देशभरात काही दिवसांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना आग लागून दुर्घटना होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. या दुर्घटनांमध्ये आतापर्यत तीन जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांना नवीन मॉडेल (दुचाकी) लॉंच करण्यास केंद्र सरकारने बंदी घातल्याची माहिती मिळत आहे.
इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना वाढल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ई-दुचाकी विकण्यास बंधन नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
देशात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वाढत असतानाच केंद्र सरकराने हा निर्णय घेतला आहे. देशात कोणतीही नवी इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांमध्ये काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. याच अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिल्लीत एक बैठक घेतली. यामध्ये केंद्राने इलेक्ट्रिक दुचाकींच्या सुरक्षेच्या विषयांवर चर्चा केली. त्यावेळी नव्या इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्यास कंपन्यांवर बंदी घालण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने नव्या इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्यास बंदी घातली असली तरीदेखील, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या दुचाकी विकण्यास कोणतीही बंधन घालण्यात आलेली नाही. सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या आणि याआधी विक्री झालेल्या दुचाकी वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित कंपन्यांना दिल्या आहेत. गडकरींच्या सूचनेनंतर अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक दुचाकी तपासणीसाठी माघारी बोलवल्या आहेत.
घटनांच्या चौकशीसाठी तज्ञांची समिती
गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या अनेक दुर्घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांची चौकशी आणि उपाययोजना करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. या तज्ञांच्या अहवालाच्या आधारे, आम्ही संबंधित कंपन्यांना आवश्यक आदेश जारी करू. आम्ही लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता-केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.