हेमंत देसाई
गुजरातमध्ये आपले शक्तिसामर्थ्य दाखवण्यासाठी हार्दिक पटेल पुन्हा पाटीदार आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याच्या तयारीत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हिमाचल पदेश व गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणूक, तसेच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंगेसची महत्त्वाची धोरणात्मक बैठक नुकतीच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या “10 जनपथ’ या निवासस्थानी झाली. या बैठकीत निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी निवडणुकांचा सविस्तर आराखडा मांडला असून, लवकरच किशोर हे कॉंग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पक्षाची बऱ्यापैकी वाताहत झाली असून, म्हणूनच पक्षात सुधारणा होत असल्यास, याचे स्वागतच करावे लागेल.
लोकसभेच्या 370 जागांवर कॉंग्रेसने लक्ष्य केंद्रित करण्याची योजना किशोर यांनी सादर केली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आदी राज्यांमध्ये पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात. तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये कॉंग्रेसने अन्य पक्षांशी आघाडी करून भाजपला टक्कर द्यावी, असा किशोर यांचा सल्ला आहे. किशोर हे आकडेवारी घेऊन मुद्दे व पुराव्यांसह मांडणी करतात. अनेक राज्यांत त्यांच्या रणनीतीस यश मिळाले असून, ते पक्षात आल्यास अथवा त्यांचे वजन वाढल्यास, आपली दुकाने बंद हतील अशी भीती कॉंग्रेसमधील काही नेत्यांना वाटत आहे. कॉंग्रेसमध्ये जी-23 गटाने बंडाचे निशाण उगारले असून,
पाच राज्यांमध्ये कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर, सोनिया, राहुल गांधी व प्रियंका गांधी आणि जी-23 गट यांच्यातील संघर्ष मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कॉंग्रेसचे नेतृत्व नव्या पिढीकडे देण्यात चूक झाली, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मध्यंतरी व्यक्त केले. त्यांना हा साक्षात्कार फारच उशिरा झालेला दिसतो. गेल्या तीन-चार वर्षांत गांधी घराण्यातील कोणत्याही व्यक्तीची भेटही झाली नाही. मात्र भेट झाली, तरी आजकाल मी काही उपदेश करण्याच्या भानगडीत पडत नाही, असे उद्गार शिंदे यांनी काढले होते. त्यांचा उपदेश कोणी ऐकूनच घेत नसल्यामुळे असे सांगणे त्यांना भागच आहे.
2019च्या पराभवानंतर, राहुल गांधी यांनी अचानकपणे पक्षाचा राजीनामा दिला. पण संकटकाळात कॅप्टनने जहाज सोडणे, हे चुकीचेच होते. निवडणुकांचा कोणताही अनुभव नसलेल्या लोकांच्या कंपूने राहुल यांना घेरले आहे. उलट पक्षाला वाचवण्यासाठी ज्या ज्येष्ठांनी महत्त्वाच्या सूचना केल्या त्यांना बाजूला सारले गेले, अशी कठोर टीका ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि राज्यसभेचे माजी उपसभापती पी. जी. कुरियन यांनी केली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरात विधानसभा निवडणूक होणार असून, भाजपप्रमाणे कॉंग्रेससाठीही ती प्रतिष्ठेची ठरणार आहे. मात्र गुजरात कॉंग्रेसमध्ये पक्षांतर्गत मतभेद तीव्र झाला असून, विवाहानंतर नसबंदी केल्यासारखी अवस्था झाली असल्याची भावना प्रदेश कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी व्यक्त केली आहे. मात्र लेवा पाटीदार समाजातील प्रभावी नेते नरेश पटेल यांना कॉंग्रेसमध्ये आणून, त्यांना गुजरातमध्ये पक्षाचा प्रमुख चेहरा घोषित करण्याची सूचना प्रशांत किशोर यांनी केली असल्याचे सांगण्यात येते. बरोबर एक वर्षापूर्वी, गुजरातमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर हार्दिक यांनी मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.
त्याचवेळी, कॉंग्रेसकडून माझ्या नेतृत्वाला गुजरातमध्ये योग्य संधी दिली गेली नाही, पालिका निवडणुकीसाठी माझी एकही सभा घेतली गेली नाही, मला प्रचारासाठी कोणीही बोलावले नाही, असा संताप पटेल यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे गुजरातमधील राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी हार्दिक यांना घेतले जाईल, हार्दिक आपल्या हाताला घड्याळ बांधून घेतील, अशी चर्चा सुरू झाली. हार्दिक यांनी त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचीही भेट घेतली होती.
वास्तविक गुजरातमध्ये सुरत पालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने लक्षणीय यश मिळवले. पक्षाचे अध्यक्ष आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकताच गुजरातचा दौरा करून, शोभायात्राही काढली होती आणि त्यास तुफान प्रतिसाद मिळाला होता. चार राज्यांमधील निवडणुकांत यश मिळवल्यावर, मोदी यांनीही गुजरातचा दौरा करून, विजययात्रा काढली होती. गेल्या काही दिवसांत गुजरातेतील कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी आप पक्षाला, तर काहींनी भाजपला जवळ केले आहे. हार्दिक यांनाही आपचे निमंत्रण होते, परंतु त्यांनी ते नाकारले असल्याचे सांगण्यात येते. आपण कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले असले, तरी त्यांना पक्षाच्या बैठकांना बोलवण्यात येत नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांचा सल्लाही घेतला जात नाही. खरे तर, सर्व निर्णय झाल्यानंतरच ते त्यांना कळतात, अशी अवस्था आहे.
काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वर्चस्व असलेल्या गुजरातमध्ये हार्दिक यांनी आपला करिश्मा निर्माण केला होता. पाटीदार समाजास ओबीसी आरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनाने गुजरातमध्ये धमाल उडवून दिली होती. त्यानंतर विधानसभेच्या 2017च्या निवडणुकीत हार्दिक हे कॉंग्रेसच्या प्रचारात सामील झाले, तेव्हा एका स्त्रीसोबतचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल करून, त्यांच्यावर चिखलफेकही झाली होती. मात्र त्यावेळी कॉंग्रेसची कामगिरी उत्तम झाली होती आणि भाजपच्या तोंडाला फेस आला होता. 2019 साली हार्दिक यांच्याकडे प्रदेश कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्षपद सोपवण्यात आले.
त्याचवेळ एका खटल्यात त्यांना निवडणूक लढवण्यास घालण्यात आलेली बंदी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. त्यामुळे हार्दिक हे विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरू शकतात. परंतु, कारण माहीत नाही पण हार्दिक आणि कॉंग्रेस श्रेष्ठी यांचे जमत असल्याचे दिसत नाही. जर त्यांची उपेक्षाच करायची होती, तर त्यांना पक्षात मुळात घेतलेच का, असा प्रश्न आहे. या स्थितीत आपले शक्तिसामर्थ्य दाखवण्यासाठी हार्दिक पुन्हा पाटीदार आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याच्या तयारीत आहेत. मात्र खरे कारण, नरेश पटेल यांच्यामुळे आपली किंमत आणखी कमी होईल, अशी शक्यता त्यांना वाटत आहे.
कॉंग्रेसची स्थिती इतकी दारुण असताना, दोघाही पटेलांना सांभाळून घेण्याची आणि त्यांनी एकत्रिपणे काम करण्याची गरज आहे. कॉंग्रेसमध्ये निवडणुका होऊन नवा अध्यक्ष निवडला गेल्यास, हार्दिक पटेलांना त्यांच्याशी चर्चा करून आपल्या समस्या सोडवून घेता येतील. कॉंग्रेसची स्थिती इतकी दयनीय आहे, की आपापसात भांडणे करून सर्वनाश ओढवून घेणे, हे दुर्दैवीच ठरेल.