पुणे- शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या पीएमपीएमएलच्या बससेवेला शुक्रवारी ब्रेक लागला आहे. कोट्यवधी रुपये थकल्याने ठेकेदारांनी बसेसची सेवा स्थगित केली आहे. मात्र यामुळे पुणेकरांना वेठीस धरले असून, लाखो प्रवासी यामध्ये नाहक भरडले जात आहेत.
पीएमपीकडून सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दींबरोबर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे १ हजार ६०० बसेसद्वारे सेवा देण्यात येते. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २ हजार बसेस आहेत. त्यापैकी जवळपास निम्म्या बसेस ठेकेदारांच्या आहेत. यामध्ये अँटोनी, ओलेक्ट्रा, बिव्हीजी आदी कंपन्यांचा समावेश आहे. या बसेसचा खर्च आणि चालकांचे वेतनाचा खर्च पीएमपी देते.
ठेकेदारांच्या दरमहा बिलांची रक्कम सरासरी १० – १२ कोटीच्या रुपयांपर्यंत असते. मागील सहा महिन्यांपासूनची ही रक्कम थकीत होती. त्यामुळे या पूर्वी देखील ठेकेदारांनी बसेस बंद करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यानंतर ठेकेदार आणि पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यात बैठक देखील झाली होती. त्यावेळी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे अदा करण्याचे आश्वासन मिश्रा यांनी दिले होते. मात्र आता थकीत पैशांअभावी ठेकेदारांनी संप पुकारला आहे. पण यामुळे सुमारे ६ लाखांहून अधिक नागरिकांना याचा फटका बसला आहे.
गुरुवारी ठेकेदारांची ५८ कोटी रुपयांची बिले काल मंजूर केली आहेत. ही रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होईल. ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारे पूर्वकल्पना दिली नव्हती. सध्या शहरात ठेकेदारांपैकी बीव्हीजी आणि विश्वयोद्धाच्या बसेस सुरू आहेत. ठेकेदारांच्या पाचशे ते सहाशे बसेस आज संचलनात आहेत. या संपाबाबत ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारे पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यामुळे ठेकेदारांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून, या अनुषंगाने नोटीस देखील त्यांना दिली आहे.
– डॉ. चेतना केरूरे, सहव्यवस्थापकीय संचालक