भाऊ ठाकूर
राहू, -गेल्या अनेक दिवसांपासून होऊ घातलेल्या; परंतु करोना व राजकीय आरक्षणामुळे लांबलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याच्या शक्यता असल्यामुळे तालुक्यामध्ये एक प्रकारची वादळापूर्वीची शांतता आहे.
सध्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्याच्या निवडणुका सुरू आहेत; परंतु त्या ही 85 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्या असूनही जसा राजकीय जल्लोष हवा तसा पाहायला मिळत नसयाने खरी प्रतीक्षा आहे ती जिल्हा परिषद, पंचायत समिती, नारपालिका, बाजार समितीच्या निवडणुकांची.
करोनामुळे अनेक सहकारी संस्थांचा कार्यकाळ संपून देखील निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या; त्यामुळे जवळ जवळ 90 टक्के सोसायट्यांच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त होते, त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणणे नियोजन देखील केले. त्यानुसार निवडणुका सुरू आहेत; परंतु त्याचबरोबर मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा देखील कार्यकाळ संपला आहे;
परंतु कोरोना काळ व राजकीय आरक्षण या गुंत्यामुळे या निवडणुका लांबल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला; मात्र अस्तित्व आणि आगामी निवडणुकांसाठी आपला वट टिकवून ठेवायचे असल्याने इच्छुक उमेदवार आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष देत आहेत. तसेच सध्या गावागावांत यात्रांचा हंगाम सुरू असून यात शक्तीप्रदर्शन करण्यात इच्छुक मंडाळींनी आघाडी घेतली असली तरी प्रमुख राजकीय पदाधिकारी शांत असल्यामुळे ही वादळापूर्वीची पूर्वीची शांतता ठरू शकते एवढे मात्र नक्की!
कुल की थोरात मारणार बाजी?
भीमा पाटस कारखाना आमदार राहुल कूल यांच्या ताब्यात आहे, तर बाजार समिती माजी आमदार रमेश थोरात यांच्या ताब्यात आहे, त्यामुळे भविष्यात रंगणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत कुल की थोरात बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
…राष्ट्रवादी ताकदीनिशी मैदानात उतरणा का?
पुढील काळात भीमा-पाटस सहकारी कारखाना व बाजार समितीच्या निवडणुका या देखील प्रस्तावित आहेत. भीमा पाटस कारखाना आता पुढील हंगामात दुप्पट क्षमतेने सुरू होणार आहे, अशी शक्यता खुद्द जिल्ह्याचे पालक मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत केल्यामुळे तो विषय मार्गी लागल्यात जमा असल्याने हा कारखाना आमदार राहुल कुल यांच्या ताब्यातच राहणार की राष्ट्रवादी त्यासाठी जोरदार मैदानामध्ये उतरणार का? तसेच आमदार कुल तो ताब्यात ठेवण्यासाठी काय व्युह रचना आणखणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.