नवी दिल्ली – आसाम आणि मेघालय यांच्यातील 50 वर्षांचा सीमावाद संपला आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज दिल्लीत करार करून वाद संपवला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी गृह मंत्रालयात करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या बैठकीला दोन्ही राज्यांचे मुख्य सचिवही उपस्थित होते.
या कराराची माहिती देताना अमित शाह म्हणाले, “मला आनंद आहे की आज आसाम आणि मेघालयमध्ये 12 विवादित मुद्द्यांपैकी 6 मुद्द्यांवर करार झाला आहे. सीमेच्या लांबीच्या बाबतीत जवळपास 70 टक्के सीमा विवादमुक्त झाली आहे. मला खात्री आहे की उर्वरित 6 ठिकाणचा वाद देखील नजीकच्या काळात सोडवला जाईल. ते पुढे म्हणाले, “वादमुक्तीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, मोदीजी जेव्हापासून देशात पंतप्रधान झाले, तेव्हापासून शांतता प्रक्रिया, विकास, समृद्धी आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले गेले आहेत”
12 क्षेत्रांशी संबंधित विवाद –
मेघालय 1972 मध्ये आसाममधून वेगळे करण्यात आले आणि आसाम पुनर्रचना कायदा, 1971 ला आव्हान दिले, ज्यामुळे सामायिक 884.9 किमी लांबीच्या सीमेच्या विविध भागांमधील 12 क्षेत्रांशी संबंधित वाद निर्माण झाले. दोन्ही राज्यांमध्ये अनेकदा सीमावाद उफाळून आला आहे. 2010 मध्ये अशाच एका घटनेत लांगपीहमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता.
करारामुळे शांतता पुनर्स्थापित होईल –
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा म्हणाले की, हा सीमावाद सोडवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या बाजूने खूप जोर देण्यात आला आहे. भारत-बांगलादेश वाद सोडवू शकतात तर देशातील दोन राज्ये का नाही, हे त्यांना पाहायचे होते. आम्ही गृहमंत्री अमित शहा आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांचे खूप आभारी आहोत. आम्ही 12 पैकी सहा वाद सोडवले आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित होईल.