नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने सहा राज्यांच्या 13 राज्यसभा सदस्यत्वासाठी 31 मार्च रोजी निवडणूक जाहीर केली. या जागा एप्रिलमध्ये रिक्त होतील. यात पंजाबच्या पाच, केरळच्या तीन, आसामच्या दोन आणि हिमाचल प्रदेश, त्रिपुरा व नागालॅंडची प्रत्येकी एक जागा असेल.
यानंतर पुढील तीन महिन्यांत आणखी 57 खासदार निवृत्त होतील. यासोबत या वर्षी 70 नवे सदस्य राज्यसभेला मिळतील. सुरुवातीस ज्या 13 जागांवर निवडणूक होत आहे. त्यात पंजाबच्या 5 आहेत.
कॉंग्रेसचे दिग्गज नेते प्रतापसिंह बाजवा, अकाली दलाचे सुखदेवसिंग ढिंढसा, नरेश गुजराल आणि भाजपचे श्वेत मलिक यांचा समावेश आहे. दुसरीकडे, आसाममधून कॉंग्रेसचा चेहरा रिपुन बोरा आणि राणी नारा यांना निरोप मिळत आहे. सध्याच्या समीकरणानुसार कॉंग्रेस तेथून एकच सदस्य निवडून देऊ शकेल. भाजपला एका जागेचा फायदा होईल.
त्रिपुरातून झरना दास यांची जागा रिक्त झाल्यावर भाजप एक उमेदवार जिंकू शकेल. केरळमधून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांची जागा रिक्त होत आहे. पाच मनोनीत सदस्यांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी, पत्रकार स्वपनदास गुप्ता, रूपा गांगुली, एस. गोपी, मेरी कोम आणि अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव आहेत.