पंजाब विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच, माजी केंद्रीय मंत्री आणि पंजाबमधून तीन वेळा राज्यसभेचे खासदार झालेले अश्वनीकुमार यांनी कॉंग्रेसचा त्याग केला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कॉंग्रेसने अपमानित केले व त्याचा प्रतिकूल परिणाम राज्यातील मतदारांवर पडला आहे. पंजाबात कॉंग्रेसचे नव्हे, तर यावेळी आपचे सरकार सत्तेवर येईल, असे मत अश्वनीकुमार यांनी व्यक्त केले आहे. कॉंग्रेसची पूर्ण वाताहत झाली असून, पक्षापासून दूर राहूनच देशाची अधिक सेवा करू शकतो, असे त्यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे. यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, आरपीएन सिंह, सुष्मिता देव प्रभृतींनी पक्षत्याग केला आहे. मात्र, कॉंग्रेसबाबतचा हा साक्षात्कार अश्वनीकुमार यांना इतक्या उशिरा कसा काय झाला, हा प्रश्नच आहे. कायदामंत्री असताना एका वादग्रस्त प्रकरणामुळे त्यांना पदत्याग करावा लागला होता. अश्वनीकुमार यांना कोणताही जनाधार नाही.
पंजाबात ते कोणत्याही अर्थाने समाजात रुजलेले नेते नाहीत. पक्षाने त्यांना भरभरून दिले असताना संकटकाळात पक्षत्याग करणे, ही त्यांची शुद्ध लबाडी आहे. मात्र, एका पाठोपाठ एक नेते पक्षत्याग करत असल्यामुळे ही चिंतेची बाब असून, त्याबद्दल आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे मत राज्यसभेतील कॉंग्रेसचे माजी गटनेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले आहे. पक्ष दिवसेंदिवस विकलांग का होत आहे, गुणवंत माणसे पक्ष सोडून का जात आहेत, याचा विचार झाला पाहिजे. एकसंध आणि मजबूत कॉंग्रेस असणे, ही देशहिताचीदेखील गरज आहे, अशी भावना आझाद यांच्याप्रमाणेच राज्यसभेतील कॉंग्रेसचे उपनेते आनंद शर्मा, लोकसभा खासदार मनीष तिवारी, त्याचप्रमाणे विवेक तनखा यांनी व्यक्त केली आहे. हे सर्व नेते कॉंग्रेसच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या जी-23 गटातील आहेत.
अश्वनीकुमार हे स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबातील असून, माझे जुने आणि जिवलग मित्र आहेत. त्यांनी कॉंग्रेसबाहेर पडणे हे दुर्दैवी आहे, असे उद्गार हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा यांनी काढले आहेत. अश्वनीकुमार हे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जवळच्या वर्तुळातील आहेत. डॉ. सिंग हे मध्यंतरी इस्पितळात भरती झाले होते आणि त्यानंतरच्या काळात ते पक्षात सक्रिय नाहीत. पाच राज्यांतील निवडणूक प्रचारातही फक्त राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हेच दौरे करताना दिसत असून, कॉंग्रेसच्या बहुसंख्य ज्येष्ठ नेत्यांवर कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. अश्वनीकुमार आणि जी-23 मधील अनेक नेते हे राज्यसभेवरच निवडून येत असून, कॉंग्रेस पक्षाचा त्यांनी फायदा उठवला आणि पक्षाला काहीही दिले नाही, असे राहुल यांचे मत असल्याचे दिसते. काहीप्रमाणात ते खरे असले, तरी आज कॉंग्रेस पक्षासमोर अस्तित्वाचेच आव्हान निर्माण झाले आहे.
अशावेळी जे जे नेते पक्षात आहेत, त्यांना बरोबर घेणे, सांभाळून घेणे, हे जरुरीचे आहे. परंतु गुलाम नबी आझाद यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्तुतिसुमने उधळली, त्यांना पद्म पुरस्कार दिला, तेव्हापासून ते गांधी घराण्याच्या मर्जीतून उतरले आहेत. आनंद शर्मा असोत, की कपिल सिब्बल किंवा मनीष तिवारी, त्यांचे आणि राहुल गांधींचे अजिबात जमत नाही, असे म्हणतात. म्हणजे जुन्या अनुभवी नेत्यांशी जवळीक नाही आणि आपल्या भोवतीचे तरुण सवंगडीही भाजपमध्ये चालले आहेत, असे दृश्य राहुल यांना बघावे लागत आहे. राहुल आणि प्रियंका हे पक्ष वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत, हे खरेच आहे. परंतु नवीन कार्यकर्ते तयार होणे, नवी टीम बांधली जाणे, ही प्रक्रिया घडून येण्यापूर्वीच पक्षातील जुन्या-नव्या नेत्यांनी साथ सोडून देणे, हे घडायला नको होते.
म्हणजेच टीम लीडर म्हणून काम करण्यात राहुल गांधी यशस्वी होताना दिसत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. कॉंग्रेस हा पक्ष राष्ट्रीय आकांक्षांचे प्रतिनिधित्व करत असल्याचे आता दिसत नाही. देशात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या नेतृत्वात नाही, असे अश्वनीकुमार यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसच्या मतांची टक्केवारीही घटत आहे. पंजाबसारख्या राज्यात कॉंग्रेसमध्ये दुफळी माजली आहे. पंजाब, गोवा व उत्तराखंडमध्ये आपच्या रूपाने जनतेसमोर एक पर्याय निर्माण होत आहे. भाजपवर टीका करतानाच, आम्ही भाजपला समर्थ पर्याय देऊ शकतो, देशासमोर एक चांगला कार्यक्रम ठेवू शकतो, हा विश्वास देण्यात कॉंग्रेसला अपयश येत आहे. जनमानसाची नाडी कॉंग्रेसला कळेनाशी झाली आहे, हे वास्तवच आहे. कॉंग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्व असले पाहिजे. अनुभव व गुणवत्तेला महत्त्व दिले पाहिजे आणि ज्येष्ठांचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि हे घडत नसल्याची भावना अश्वनीकुमार यांनी व्यक्त केली आहे.
त्यांच्या मतांमध्ये वावगे काही आहे, असे बिलकुल नाही. जनतेला प्रेरणा देणारे नेतृत्व उभे करण्यात, जनतेशी भावनात्मक कनेक्ट प्रस्थापित करण्यात कॉंग्रेस पक्ष अयशस्वी होत असल्याचे दिसते; परंतु कॉंग्रेसने काय करायला पाहिजे, याबद्दल केवळ वातानुकूलित खोलीत बसून टीकाटिप्पणी करणाऱ्या अश्वनीकुमारसारख्या नेत्यांनी स्वतःहून पंजाबात पक्ष वाढवण्याचे किती प्रयत्न केले? सोनियाजी व डॉ. मनमोहन सिंग यांना भेटून आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या का? आज केवळ आरामखुर्चीवर बसून विचारमंथन करणारे नेते कॉंग्रेसला नको आहेत, तर मैदानात उतरून राबणारे कार्यकर्ते हवे आहेत. म्हणूनच अश्वनीकुमार गेल्यामुळे कॉंग्रेसचे फारसे काही नुकसान होणार नाही.