पिंपरी – पर्यावरणासाठी नागरिकांनी सीएनजी अथवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापरा करावा, असे आवाहन शासन आणि महापालिकेकडून केले जाते. मात्र पोलीस अथवा महापालिकेच्या ताफ्यात एकही सीएनजी अथवा इलेक्ट्रिक वाहन नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलीस प्रशासन आणि महापालिकेकडे प्रदूषण करणारी डीझेल आणि पेट्रोलवरील
वाहनेच आहेत.
आजच्या काळात वाढते प्रदूषण ही पर्यावरणासाठी मोठी समस्या आहे. यात मोठा वाटा हा रस्त्यावर चालणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा आहे. हे प्रदूषण कमी करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे शासन सांगत आहे. कारण पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलन प्रक्रियेतून कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोक्साईट आणि नायट्रोजन ऑक्साईड हे वायू निर्माण होतात. हे वायू पर्यावरणासाठी अत्यंत विनाशकारी आहेत. मात्र सीएनजी या वायूच्या ज्वलनाच्या प्रक्रियेतून कमी प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जित होतात. सीएनजी वापराचे आणखी एक कारण म्हणजे तो पेट्रोल डिझेलच्या तुलनेत स्वस्त असतो. तसेच इंजिनमधून आवाजही कमी येतो.
महापालिकेची स्थिती पिंपरी चिंचवड महापालिकेकडे सध्या 611 वाहने आहेत. त्यापैकी 152 वाहने ही प्रशासकीय वापराकरिता म्हणजे अधिकाऱ्यांसाठी आहेत. तर उर्वरित 459 वाहने ही तांत्रिक वापरासाठी म्हणजे, कचरा वाहतूक, अतिक्रमण विभाग व स्थापत्य विभागासाठी आहेत. शहरातील प्रदुषणात घट व्हावी, यासाठी शासनाच्या आदेशानुसार शहरातील परिवहन विभागातील पीएमपीएमएलच्या बस सीएनजीवर चालणाऱ्या खरेदी केल्या. त्यानंतर आता इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या.
एकीकडे परिवहन विभागाचे प्रयत्न सुरू असताना महापालिकेने मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. महापालिकेने आत्तापर्यंत एकही वाहन सीएनजी अथवा इलक्ट्रिवर चालणारे घेतलेले नाही. याचे समर्थन करताना महापालिकेचे अधिकारी म्हणतात की आम्हाला आठ लाख रुपये किंमतीपर्यंतची वाहन खरेदी करता येतात. मात्र सध्या बाजारात असलेल्या इलेक्ट्रीक वाहनांची किंमत 12 लाखांच्या खाली नाही. त्यामुळे ही वाहने आम्हाला खरेदी करता येत नाही. मात्र आगामी काळात वाहने भाडेतत्वावर घेताना इलेक्ट्रिक वाहने प्राधान्याने घेतली जातील.
पोलिसांची अडचण
पोलीस दलाकडे सध्या 110 दुचाकी आणि 126 चारचाकी आहेत. तसेच आगामी काही दिवसांमध्ये पोलिसांच्या ताफ्यात आणखी सुमारे 80 दुचाकी आणि 10 चारचाकी वाहने येणार आहेत. विशेष म्हणजे यापैकी एकही वाहन हे सीएनजी अथवा इलेक्ट्रिकवर चालणारे नसणार आहे. याला कारण म्हणजे पूर्वी सीएनजीचे पंप फार थोडे होते. तसेच ही वाहने लवकर पिकअप घेत नाहीत. त्यामुळे व्हीआयपी बंदोबस्त किंवा चोरांचा पाठलाग करताना ही वाहने कमी पडू शकतात. तसेच इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग करण्यासाठी वेळ लागतो. पोलिसांना रात्र-दिवस गस्त घालावी लागते तसेच कोणत्याही क्षणी लवकरात-लवकर घटनास्थळी पोहचावे लागते. अशा परिस्थितीत वाहन चार्जिंगला असल्यास अडचण येऊ शकते.