श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये चौकीबाल तंगधर रस्त्यावर सोमावारी रात्री आणि मंगळवारी पहाटे लष्कराने 30 नागरिकांची सुटका केली. खुनी नाला आणि एसएम पर्वताजवळ झालेल्या बर्फवृष्टी आणि दोन हिमस्खलनामुळे हे नागरिक अडकले होते.
एनसीपास जवळ नागरिकांची वाहने अडकल्याची माहिती मिळताच भारतीय लष्कराची दोन हिमस्खलन मदत पथके, अभियंत्यांची पथके तातडीने घटनास्थळावर तैनात करण्यात आली. दोन हिमस्खलनामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 14 नागरिकांची सुटका करून त्यांना नीलम येथे आणण्यात आले आणि 16 नागरिकांना एनसीपास जवळ आणण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुटका केलेल्या नागरीकांना अन्न औषधे आणि त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. बारा वाहने मंगळवारी सोडवण्यात आली. हे संपूर्ण बचाव कार्य पाच ते सहा तास सुरू होते.