पुणे -रेल्वे स्थानके आणि रेल्वे कॉलनीमधील विद्युत ऊर्जेची गरज लक्षात घेत रेल्वे प्रशासनाकडून सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहेत.
यामुळे विभागाच्या वीजबिलात वर्षाला सुमारे 34 लाख 98 हजार बचत होणार आहे. तर, सुमारे 432.5 मेट्रिक टन मेट्रीक टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी होणार आहे.
भारतीय रेल्वेकडून 2030 सालापर्यंत शून्य कार्बन’ उत्सर्जनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याअंतर्गत विविध रेल्वे स्थानक, रेल्वे कॉलनी, कार्यालये आदी आस्थापनांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढविण्यात येत आहे.
पुणे रेल्वे विभागाने आतापर्यंत सुमारे 765 केडब्ल्यूपी क्षमतेचे प्रकल्प उभारले आहेत. पुणे विभागातील पुणे, शिवाजीनगर, खडकी स्थानक आणि चिंचवड येथील रेल्वे कॉलनीतील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला.
पुणे येथे 274.56, शिवाजीनगरमध्ये 77.22, खडकीमध्ये 74.88 आणि चिंचवड रेल्वे कॉलनीत 4 केडब्लूपी क्षमतेचे प्रकल्प बसविले आहेत. तर, पिंपरी स्टेशन येथे 55 केडब्लूपी क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे. या प्रकल्पांतून दरवर्षी 6 लाख 20 हजार 430 केडब्ल्यूएच/यूनिट सौरऊर्जेची निर्मिती होणार आहे.
पिंपरी “शुद्ध शून्य उत्सर्जन’ श्रेणीत
सौर प्रकल्पांमुळे शिवाजीनगर, खडकी, पिंपरी या रेल्वे स्थानकांवर दैनंदिन वापरासाठी आवश्यक विद्युत ऊर्जेएवढी आणि त्यापेक्षा अधिक ऊर्जेची निर्मिती होते. परिणामी ही स्थानके शुद्ध शून्य उत्सर्जन’ (नेट झिरो) श्रेणीत समाविष्ट झाली आहे.
सध्या पुणे स्टेशन येथे 434 केडब्लूपी क्षमतेचा प्रकल्प सुरू आहे. पुणे स्टेशन पूर्ण शुद्ध शून्य उत्सर्जन'(नेट झिरो) करण्यासाठी आवश्यक क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे काम येत्या काळात पूर्ण होणार आहे.