रांची – भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज रांची येथील भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्य सैनिक वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन केले.
दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना रणावतने स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आज पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य सैनिक वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन केले. कंगनाला ही एकप्रकारे चपराक मानली जात आहे.
स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात, भारतातील आदिवासी परंपरा आणि त्यांच्या शौर्याच्या कहाण्यांना हा देश अधिक अर्थपूर्ण आणि अधिक मोठी ओळख प्राप्त करून देईल. याकरिता भगवान बिरसा मुंडा यांची जयंती असलेला 15 नोव्हेंबर हा दिवस “आदिवासी गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जाईल. असे या प्रसंगी पंतप्रधानांनी सांगितले.
देशाच्या सरकारमध्ये स्वतंत्र आदिवासी मंत्रालयाची निर्मिती करून देशाच्या धोरणांना आदिवासी समाजाच्या हिताशी जोडण्याचे काम सर्वप्रथम अटल बिहारी वाजपेयी यांनी केले, असे त्यांनी पुढे सांगितले.
आधुनिकतेच्या नावाखाली आपली विविधता, प्राचीन ओळख आणि निसर्ग यांचे नुकसान करणे समाजाच्या हिताचे नाही हे भगवान बिरसा जाणून होते. मात्र याचवेळी बिरसा आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आणि त्यांच्या समाजातील कमतरता आणि वाईट गोष्टींबद्दल आवाज उठविण्याचे धैर्य त्यांच्यात होते असे मोदी यांनी सांगितले.
भारतासाठीचे निर्णय घेण्याची शक्ती भारतीयांच्या हाती सोपविणे हेच स्वातंत्र्य चळवळीचे लक्ष्य होते. मात्र त्याचवेळी, धरती आबा म्हणून प्रसिध्द असलेल्या मुंडा यांनी भारतातील आदिवासी समाजाची ओळख पुसून टाकण्याची इच्छा असणाऱ्या विचारधारेविरुद्ध देखील त्यांचा लढा सुरू होता.
भगवान बिरसा समाजासाठी जगले, त्यांची संस्कृती आणि त्यांच्या देशासाठी त्यांनी त्यांचे प्राण अर्पण केले. त्यांच्या छोट्या जीवनकाळात त्यांनी देशासाठी अख्खा इतिहास लिहिला आणि भारतातील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले. असे पंतप्रधान पुढे म्हणाले.