येवला – विकासाची कामं हातात नाही, त्यामुळे हिंदू-मुस्लीम भांडणं लावली जात असल्याचा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला . ते नाशिकमधील येवला येथे आढावा बैठक आणि विकास कामांच्या उद्घाटनानंतर पत्रकाराशी बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. विकासाची कामं हातात नसले की हिंदू-मुस्लीम भांडणं लावून देणे यांचे काम आहे. अनेक राज्यात निवडणुका आलेल्या असल्याने हिंदू मुस्लिमानांमध्ये फूट पाडण्यासाठी असं कृत्य केले जात आहे.
विलिनीकरणाची मागणी भाजपाच्या काळातही रद्द
खासदार भारती पवार यांनी महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांवर दडपशाही करून निलंबन करत आहे, असा आरोप केलाय. याबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यांची विलिनीकरण ही मागणी आहे. मात्र, ती पूर्ण होणार नसून भाजपाच्या काळात देखील मुनगंटीवार यांनी ही मागणी रद्द केली होती.