राज्यासह सबंध देशभरात अनलॉकचे वारे उत्साहाने वाहत आहेत. पर्यटनासह सर्वच दैनंदिन व्यवहार आता पूर्ववत होत आहेत. अर्थव्यवस्थेसाठी आणि लोकांच्या दैनंदिन आयुष्यासाठी ही सुवार्ता असली तरी निसर्ग आणि पर्यावरणाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. कारण लॉकडाऊनच्या काळात हवेतील गुणवत्ता सुधारली होती.
पण व्यवहार सुरळीत झाल्याने वाहनांची वर्दळ परत वाढली असून येणाऱ्या काळात वाहतूककोंडीचा सामना सर्वांनाच करावा लागणार आहे. वर्दळ-वाहतूक वाढल्याने साहजिकच वायूप्रदूषणही वाढणार आहे. आजघडीला दहा पैकी नऊ व्यक्तींवर प्रदूषणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात पीएम 2.5 आणि पीएम 10 शिवाय ओझोन,
नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन मोनाऑक्साइड सारख्या प्रदूषणकारक घटकांमुळे प्रदूषणात भर पडत असल्याचा उल्लेख आहे. अन्य एका अहवालात 2020 मध्ये दिल्लीत पीएम 2.5 ची घनता निश्चित केलेल्या पातळीपेक्षा 17 पट अधिक आहे. त्याचवेळी मुंबईत 8 पट, कोलकाता येथे 9 पट आणि चेन्नईत पाच पट अधिक घनता राहिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार प्रदूषण स्तर निश्चित करण्याचे निकष आणखी कठीण करण्यात आले आहेत.
सुरुवातीला प्रदूषणमुक्त पातळीसाठी पीएम 2.5 ची घनता 25 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपर्यंत गृहित धरत होतो आणि ती सुरक्षित मानत होतो; परंतु आता जागतिक आरोग्य संघटनेने 15 मायक्रोग्रॅम घनमीटरची घनतादेखील आरोग्याला हानिकारक असल्याचे म्हटले आहे. प्रदूषण फक्त शहरातच असते, ग्रामीण भागात नाही असा आपला सर्वसाधारण समज आहे. परंतु सध्या खेडोपाड्यातील वाहनांची वाढती संख्या आणि वर्दळ पाहता ग्रामीण भागदेखील प्रदूषित होत चालला आहे.
शहराप्रमाणेच गावातही धुळीचे प्रचंड प्रमाण असून गावात कचऱ्याची विल्हेवाट योग्य रितीने होत नसल्याने प्रदूषणाच्या समस्येत आणखीच भर पडताना दिसून येते. पण ग्रामीण भागात हवेतील गुणवत्ता शहराच्या तुलनेत बरी असते. परंतु वास्तविक दोन्ही ठिकाणं आता माणसांना राहण्यासाठी योग्य राहिलेली नाहीत. हवेतील प्रदूषणामुळे दरवर्षी 70 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू होतो. प्रदूषणाचा प्रत्येक वयोगटातील व्यक्तीवर परिणाम होतो.
एवढेच नाही तर आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळावर देखील हवेतील प्रदूषणाचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे बाळाचा काहीवेळा दुर्दैवाने प्रदूषणामुळे गुदमरून मृत्यू होऊ शकतो किंवा जन्मानंतर त्याचे वजन कमी होऊ शकते. आईकडून प्रदूषित वातावरणात श्वास घेतला जात असल्याने रक्तपेशी कमकुवत होतात. बाळाचे वजन कमी असल्यामुळे गर्भावस्थेतच बाळाला नाळेच्या माध्यमातून पुरेसे पोषण होत नाही.
एकंदरित आपण जन्मापासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत हवेतील प्रदूषणाचा सामना करत आहोत. तरुणाईदेखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. दमा, त्वचारोग, डोळ्यात जळजळ, ऍलर्जी यासारख्या समस्या प्रदूषणामुळे होत आहेत. जी मुले बाहेरच्या वातावरणात, उन्हात खेळायला जातात, फिरायला जातात, ते आजारी पडत आहेत. पूर्वी असे घडत नव्हते. लहानपणातच मुलांना दम्याचा विकार होत आहे.
असे का होत आहे, यावर कोणीही गांभीर्याने विचार करण्यास तयार नाही. हवेतील प्रदूषणामुळे अनेकांना श्वसनाचा विकार होत आहे. परिणामी हृदयासंबंधीचे आजारही वाढले आहेत. मेंदू आणि विचार करण्याची क्षमता देखील कमी होत आहे. स्वच्छ वातावरणात राहणाऱ्याच्या तुलनेत प्रदूषित वातावरणात राहणाऱ्या व्यक्ती अधिक रागीट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून प्रदूषित भागात राहात असेल, तर तिला कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो.
फुफ्फुसाचा कर्करोग आणि रक्ताचा कर्करोग म्हणजेच ल्यूकिमियासारख्या अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका असू शकतो. वाहनांची वाढती संख्या, वाढते शहरीकरण यासारख्या गोष्टी प्रदूषणाला हातभार लावत आहेत. जर आपण नवीन निवासी क्षेत्र विकसित करत असाल तर संभाव्य लोकसंख्या पाहता कार्बन आणि कचऱ्याचे निवारण करण्यासाठी योग्य व्यवस्था उभारायला हवी. आहारातून किती दूषित अन्न बाजूला काढावे लागेल, गाडीतून किती प्रदूषण होईल, वीज आणि पाण्याची व्यवस्था,
लोकांच्या प्रवासातून हवेच्या गुणवत्तेवर किती परिणाम होणार आहे, या सर्व गोष्टी पाहाव्या लागतील. ही शहरीकरणाची संभाव्य व्यवस्था असते. भविष्यात कोणत्याही भागात निवासी क्षेत्र वाढवताना निश्चित लोकसंख्येसाठी सातत्यपूर्ण विकासाची व्यवस्था आखावी लागेल. याचे तात्पर्य एवढेच की जेवढा कचरा जमा होईल किंवा कार्बन उत्सर्जन अधिक होईल आणि त्याला नियंत्रित करण्यासाठी आणि वातावरणावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी कंपोस्ट, हरित क्षेत्र, सांडपाणी निराकरण आदींची सोय करणे आवश्यक आहे.
सुनियोजित शहरीकरणात अशा प्रकारच्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी सुरुवातीला सीएनजीची सोय झाली, आता बॅटरीवर आधारित वाहने आणली जात आहेत. परंतु बॅटरी चार्ज करण्यासाठी वीज उत्पादन करताना त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाची दखल कोणी घेतली आहे का? भारतात व्यापक प्रमाणात कोळशातून वीज तयार होते. दुसरीकडे आपल्याकडे हायड्रोपॉवर आणि आण्विक ऊर्जेतून होणाऱ्या विजेचे प्रमाण खूपच मर्यादित आहे. एकूण वीज उत्पादनापैकी आठ टक्केच स्वच्छ ऊर्जा मिळते.
उर्वरित विजेसाठी आपण थर्मल पॉवरवर अवलंबून आहोत. कोळशासाठी जंगलतोड होईल आणि कोळशातून कार्बनडायऑक्साइड बाहेर येईल. यापासून तयार वीज अनेक शहरात पुरवली जाईल आणि त्यापासून गाडीची बॅटरी चार्ज होईल. साहजिकच हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी ही पुरेशी व्यवस्था नाही. शेवटी प्रदूषणाच्या कारणांना समजून घेतले पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली करणे, धोरणकर्त्यांनी सर्वसमावेशक योजना आखणे यासाठी प्रयत्न करायला हवेत.
दक्षिण आशियात भूतान हा एकमेव देश असा आहे की तेथे कार्बन उत्सर्जन नकारात्मक पातळीवर आहे. म्हणजेच प्रदूषणाची पातळी कमी आहे. नैसर्गिकरित्या समृद्ध आणि सुरक्षित असा भूतान देश आहे. त्याचवेळी भारतासकट अनेक दक्षिण आशियायी देशातील हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे. म्हणून हवेतील प्रदूषणांच्या चिंतेचा आणखी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.