कलेढोण – खटाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांचा शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी पिढ्यान्पिढ्या संघर्ष सुरू आहे. पाणीप्रश्नाचे राजकारण होत असल्याने भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. निवडणुका आल्या की, राजकीय नेते पाणीप्रश्नावर टाहो फोडून आश्वासने देतात आणि निवडून आल्यानंतर पाच-पाच वर्षे गायब होतात. ही शोकांतिका असताना, महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर यावा, यासाठी कलेढोण ग्रामपंचायतीचे गटनेते राजेंद्र जुगदर व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतेच निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात उगम पावलेल्या कृष्णा, कोयना, उरमोडी नद्यांच्या पात्रांवर उरमोडी, जिहे-कठापूर, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प आहेत. त्यामुळे सातारा, सांगली, सोलापूरपर्यंतचा भाग ओलिताखाली आला आहे. ज्या जिल्ह्याने हजारो गावांची तहान भागवली, त्याच जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न आजही सोडवण्यात आलेला नाही. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या तत्कालीन जनसेवकांनी उशाला असलेले पाणी इतरांच्या घशात घालण्याचा पराक्रम केला.
काही जणांनी या मुद्द्याचे राजकारण केले; परंतु भूमिपुत्रांनी चळवळी, पाणी परिषद, आंदोलन, निवेदन या माध्यमातून संघर्ष सुरू ठेवला आहे. तालुक्याला क्रांतिकारी चळवळीचा इतिहास आहे. आताच्या महाविकास आघाडी सरकारने राजकीय फायदा न घेता, हा प्रश्न सोडवावा, अशी भावना येथील लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांची आहे.
कलेढोण हे द्राक्ष बागांचे गाव आहे. राज्याला परकीय चलन मिळवून देणारी ग्रामीण भागातील ही एकमेव बाजारपेठ आहे. या भागातील शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळाल्यास द्राक्ष उत्पादन वाढेल. त्यातून तरुणाईचे शेती, रोजगार हे प्रश्न सुटतील.