पुणे : अत्यावश्यक कामांसाठी खोदण्यात आलेल्या रस्ते पूर्ववत करावे आणि त्यानंतरच पुढील खोदाई टप्प्या टप्याने करावे असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी बुधवारी पालिका प्रशासनास दिले. तसेच शहरातील खड्डयांबाबत उद्या ( गुरूवारी) समान पाणी योजनेचे अधिकारी तसेच कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक रासने यांनी बोलविली आहे.
शहरात गेल्या आठवडयाभर सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांवर मोठया प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे, शहरात वाहतूक कोंडीसह भर पावसाळयात पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच, पावसाळयातही महापालिकेने समान पाणी योजना तसेच ड्रेणेज विभागाची कामे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर मोठया प्रमाणात खोदाई झालेली असून रस्त्यांची दुरूस्तीही झालेली नाही. त्यामुळे, महापालिकेवर मोठया प्रमाणात टिका होत असून याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी म्हणून ही जबाबदारी आमचीच असल्याचे सांगत; स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पुढील 15 दिवसात शहरातील रस्ते पूर्ववत केले जातील असे मंगळवारी स्पष्ट केले होते. त्यानंतर , रासने तातडीनं बुधवारी प्रशासनास सर्व खोदाई थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रासने म्हणाले की, शहरात सध्या समान पाणी योजना आणि ड्रेणेज लाईन टाकण्याची कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे करताना प्रशासनाकडून ती टप्प्या टप्याने होणे अपेक्षित होते, त्यानुसार, थोडे थोडे काम करून रस्ता तातडीनं पूर्ववत होईल याची खबरदारी घेणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दूर्लक्ष झाल्याने ही स्थिती उद्वभवली असून, या पुढे शहरात कोणत्याही प्रकल्पासाठी एक इंचही जागा न खोदता आधी खोदाई केलेले रस्ते 100 टक्के पूर्ववत करावेत त्यानंतरच पुढील खोदाई करावी तसेच पुढील खोदाईनंतर लगेच रस्ते पूर्ववत होतील याचा कालावधीसह कृती आराखडा तयार करावा अशा सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. तसेच, खोदाई सुरू असलेल्या विभागांची तातडीची बैठक बोलविली असून पहिली बैठक समान पाणी योजनेच्या कामासाठीची असणार आहे.
प्रशासनाने खोदाई नंतर रस्ते पूर्ववत करण्याचे नियोजन अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात एकाच वेळी अनेक कामांसाठी खोदाई करण्यात आली, त्यानंतर दुरूस्तीचे कामही योग्य झालेल्या नसल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे सर्व खोदाई थांबविण्याच्या सूचना केल्या असून आधी केलेल्या खोदाईचे रस्ते पूर्ववत करावेत नंतर पुढील खोदाई करावी, त्याचे नियोजन कसे असेल, त्यासाठीची कालमर्यादा काय असेल यावर चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे. – हेमंत रासने ( स्थायी समिती अध्यक्ष )