लाहोर – पाकिस्तानातील पंजाब प्रांतात इशनिंदेच्या आरोपाखाली जमावाकडून श्रीलंकेच्या नागरिकाच्या हत्या प्रकरणी तब्बल 800 जणांच्या विरोधात दहशतवादाचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 13 जण प्रमुख संशयित आहेत. तर 118 जणांना अटक करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आज सांगितले. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी पाकिस्तान सरकारवर मोठा दबाव येऊ लागला आहे.
शुक्रवारी तेहरीक ए लबाईक पाकिस्तान या कट्टर इस्लामी गटाच्या समर्थकांनी एका कपड्यांच्या कारखान्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये या फॅक्टरीचे जनरल मॅनेजर प्रियांथा कुमारा दियावर्दना यांचा मृत्यू झाला. दियावर्दना यांचा मृतदेहही जमावाने जाळून टाकला होता. दियावर्दना हे अवघे 40 वर्षांचे होते. मूळचे श्रीलंकेतील कॅन्डी शहरातील रहिवासी असलेले दियावर्दना हे लाहोर पासून 100 किलोमीटरवर असलेल्या सियालकोट जिल्ह्यातील राजको इंडस्ट्रीजमध्ये गेल्या 7 वर्षांपासून जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते.
श्रीलंकेच्या संसदेने आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी या हत्या प्रकरणाचा तीव्र निषेध केला होता. या हत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची हमी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाळतील, अशी अपेक्षाही राजपक्षे यांनी व्यक्त केली होती.
एप्रिल 2017 मध्ये निंदनीय मजकूर ऑनलाइन पोस्ट केल्याचा आरोप असलेल्या विद्यापीठातील विद्यार्थी मशाल खानची संतप्त जमावाने हत्या केली होती. तर 2014 मध्ये पंजाबमध्ये पवित्र ग्रंथाची विटंबना केल्याचा आरोप असलेल्या एका ख्रिश्चन जोडप्याची हत्या करण्यात आली आणि नंतर त्या दोघांनाही भट्टीमध्ये फेकून देम्यात आले होते.
हत्या, जाळपोळ आणि उग्र निदर्शने
कुमारा दियावर्दना यांनी काही धार्मिक ग्रंथाची पाने फाडल्याचे वृत्त पसरल्यावर शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास 800 जणांच्या जमावाने या फॅक्टरीवर हल्ला केला होता. दियावर्दना यांना ऑफिसमधून खेचून बाहेर आणण्यात आले आणि बेदम मारहाण करण्यात आली. त्यात दियावर्दना यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जमावाने त्यांचा मृतदेहही पेटवून दिला होता. या जमावाने नंतर वझिराबाद रस्ता रोखून उग्र आंदोलनही केले होते. त्यानंतर ठिकठिकाणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या ठिकाणच्या 160 व्हिडीओच्या मदतीने दोषींची ओळख पटवण्यात येत आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.