ठाणे जिल्ह्यातील आदिवासी झाडपाला खाऊन राहतात
मुंबई, दि. 27 – आज विधान परिषदेत एका सदस्याने असे सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी झाडपाला खाऊन राहण्याची पाळी आली आहे. कारण अपुरा धान्यपुरवठा. एका लक्ष्यवेधी सूचनेवर बोलताना स्वतंत्र सदस्य न. वा. लिमये म्हणाले, रेशन दुकानात पुरेसे धान्य नसल्यामुळे कित्येक आदिवासी कुटुंबांवर झाडपाला खाऊन राहण्याचं संकट ओढवले आहे.
या जिल्ह्याला पुरेसा धान्यपुरवठा करणे शक्य झालेले नाही. मात्र खुल्या बाजारात धान्य भरपूर आहे. पण आदिवासी गरीब असल्यामुळे त्यांना ते धान्य खरेदी करणे शक्य होत नाही ही गोष्ट खरी आहे. तथापि रेशन दुकानांमार्फत शक्य तेवढे धान्य देण्याचा सरकार प्रयत्न करील.
कागदाची टंचाई
कागदाची टंचाई भारतात तीव्रपणे जाणवते आहे. पुस्तके, वर्तमानपत्रे यांवर कागदाच्या टंचाईमुळे संकट ओढवते. याचा परिणाम कुठल्याही विकसनशील देशाच्या एकूणच शैक्षणिक जीवनावर होतो. हा कागदाच्या टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने भारत सरकारशी नुकताच एक महत्त्वाचा करार केला आहे. भारतात कागदाची निर्मिती प्रामुख्याने बांबूपासून केली जाते.
कागदाचे या पद्धतीने केलेले उत्पादन मागणीच्या मानाने खूपच कमी पडते. यावर उपाय म्हणजे बांबूखेरीज इतर कुठल्यातरी झाडापासून कागद तयार करणे हा होय. ही पर्यायी उत्पादनाची शक्यता निर्माण करण्यासाठीच युनोने हा करार केला आहे. या करारानुसार अस्तित्वात येणारा संशोधन प्रकल्प चार वर्षांचा आहे. यासाठी एक कोटी ऐंशी लक्ष रुपये देण्यात येतील.