अमेरिका व रशियाच्या अण्वस्त्र स्पर्धेमुळे नव्या जागतिक युद्धाचा धोका
टोकियो, दि. 4 – अण्वस्त्र स्पर्धा चालविल्याबद्दल चीनने रशियाला व अमेरिकेला दोष दिला आहे. चीन म्हणतो ही दोन राष्ट्रे तोंडाने मात्र समझोता, शांततामय सहजीवन यांचा जप त्यांनी ठेवला आहे आणि तिकडे अण्वस्त्र स्पर्धा तीव्रतेने चालू ठेवली आहे. या संबंधात चिनी वृत्तसंस्थेने असे प्रसिद्ध केले आहे की, जगातील ही दोन बडी राष्ट्रे नव्या जागतिक युद्धास कारणीभूत होणार आहेत. कारण त्यांच्याच भयंकर स्वरूपाची स्पर्धा चालू असून तिचे युद्धात पर्यावसान होणे अटळ आहे.
पुणे, मुंबई व नागपूरला कंपोस्ट खत कारखाने
पुणे – पुणे, मुंबई व नागपूर या शहरांमध्ये कंपोस्ट खत कारखाने उभारण्यास केंद्र सरकारने तांत्रिकदृष्ट्या तयारी दर्शविली आहे, अशी माहिती डॉ. एस. आर. बरुआ यांनी दिली.
जयप्रकाशांचे तत्त्वज्ञान म्हणजे गांधी-लेनिन यांचे मिश्रण
भोपाळ – गांधीवाद आणि लेनिनवाद यांच्या मिश्रणातून आपले तत्त्वज्ञान तयार झाले असल्याचे सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण यांनी सांगितले. नारायण म्हणाले, “माझे सुरुवातीचे धडे मी लेनिनकडून घेतले. त्याचवेळी माझा गांधीवादावरही विश्वास होता.’ ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीपासून दूर राहून जनतेत काम केले पाहिजे तर विधिमंडळातील पुढाऱ्यांनी जनतेचा आवाज उठविण्याचे काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
उत्पादनवाढ हा गरिबी हटविण्याचा मार्ग
सोलापूर – गरिबीहटाव म्हटल्याने देशातील गरिबी हटणार नसून देशाच्या सर्व क्षेत्रातील उत्पादनात वाढ झाल्यानेच ती हटणार आहे, असे विचार प्रसिद्ध उद्योगपती हिराचंद यांनी व्यक्त केले आहे.