भारतीय घटना सर्वाधिक जनताभिमुख आहे
नाशिक, दि. 4 – भारताची घटना ही सर्वाधिक जनताभिमुख घटना आहे. आपल्या मूलभूत हक्कांसाठी न्यायालयात जाणे व न्यायालयाकडून ते मिळविणे ही सोय फक्त भारतीय घटनेतच आहे, असे बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, अमेरिकेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात जेवढ्या घटनादुरुस्त्या झाल्या नाहीत तेवढ्या स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय घटनेत झाल्या. नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी त्या आवश्यक होत्या.
गरिबांना डोळ्यापुढे ठेवून योजना आखावी
मुंबई – गरीब जनतेला डोळ्यांसमोर ठेवून नियोजन मंडळाने विकासाची दिशा आखल्याखेरीज देशाची आर्थिक सुधारणा होणार नाही; उलट ती खालावतच जाईल असा इशारा नियोजन मंडळाचे माजी सभासद डॉ. मिन्हास यांनी दिला आहे.
राज्यात आणखी एक औष्णिक वीज केंद्र
मुंबई – 500 मेगावॅट वीज उत्पादन शक्तीचे औष्णिक वीज उत्पादन केंद्र तुर्भे येथे उभारण्यासाठी सरकारने टाटा कंपनीला तत्त्वतः मान्यता दिली आहे. सदर प्रकरणात सरकार लवकरच अंतिम निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकार
परिषदेत सांगितले.
सिनेकलावंतांचा पत्रकारांवर बहिष्कार
मुंबई – सिने व्यवसायाबद्दल सतत अपप्रचार करणाऱ्या पत्रकारांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय येथील सिनेकलावंतांनी घेतला आहे. सिने कलावंतांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला प्रसिद्धी देण्यामुळे त्यांच्याबद्दल अपप्रचार होत असतो. या बहिष्कारामुळेच सुपर स्टार नाइट चा एक नियोजित कार्यक्रम नुकताच रद्द करण्यात आला. या बहिष्कारास फिल्म प्रोड्यूसर्स कौन्सिल व सिनेकलावंत असोसिएशनने पाठिंबा दिला आहे.