नाशिक – राज्यात दि. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, शासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या मनात विश्वास वाढावा, हा यामागील उद्देश आहे. मात्र याच महसूल सप्ताहात एका तहसीलदाराने केलेला पराक्रम सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरतो आहे.
नाशिकमधील तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी तक्रारदाराची गौण खनिज प्रकरणातील जवळपास सव्वा कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी तब्बल 15 लाखांची लाच मागितली होती आणि तिच लाच स्वीकारताना त्यांना एसीबीने सापळा रचत रंगेहाथ अटक केली आहे.
यानंतर त्यांच्या घराची झाडाझडतीत एसीबीला 4 लाख 80 हजार रोख रक्कम, 40 तोळे सोने आणि 15 तोळे चांदीचे दागिने आणि इतर कागदपत्रे असा जवळपास 25 लाखांचा मुद्देमाल प्राथमिक तपासात आढळून आला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात लाचखोरीचा विषय हा गाजला होता. ज्यात घरात 85 लाखांची रोकड सापडलेल्या नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची ईडी चौकशी करण्याची घोषणाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
नाशकात यंदा 151 लाचखोरांवर कारवाई
नाशिक अँटी करप्शन ब्युरोची सध्या धडाकेबाज कारवाई सुरु आहे. एकट्या नाशिक विभागातच चालू वर्षी 104 गुन्ह्यांमध्ये तब्बल 151 लाचखोरांवर कारवाई करण्यात आल्याने राज्यात लाच घेण्यात नाशिक सध्या पहिल्या क्रमांकाचा विभाग बनला आहे. अनेक सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी करत 5 लाखांची सुद्धा सेव्हिंग होत नाही. मात्र, दुसरीकडे सरकारी अधिकारी मात्र कुठे 30 लाख तर कुठे 15 लाखांची लाच घेतांना एसीबीकडून पकडले जात असून त्यांच्या घरी कोट्यवधींचे घबाड हस्तगत केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.