मुंबई : भाजप येत्या महापालिका निवडणुकांसाठी किमान ४० टक्के तिकिटे ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस एका कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधत होते. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की, भाजपकडून महापालिका निवडणूक लढवणाऱ्यांपैकी किमान ४० टक्के उमेदवार ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील. कोणतीही लोकशाही संस्था ही समाजाचे प्रतिबिंब असते. ती संस्था समाजाला आकार देखील देते. गेल्या बीएमसी निवडणुकीत एकूण २१६ उमेदवारांचे गुन्हेगारी रेकॉर्ड होते. काही चुकीचे लोक आहेत हे खरे आहे, परंतु सर्वांना भ्रष्ट म्हणणे देखील चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले. जर संपूर्ण व्यवस्था वाईट असती तर, आपला देश इतक्या वेगाने वाढला नसता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. जर भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर प्रश्न असा आहे की, सरकारकडे कारवाई करण्याची ताकद आहे का? मला वाटते की, आम्ही ते दाखवून दिले आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. फडणवीस यांनी लोक सहभागातूनच लोकशाही मजबूत होत असल्याचे म्हटले. जोपर्यंत नागरिक सहभागी होत नाहीत तोपर्यंत व्यवस्थेतून चुकीचे लोक काढून टाकले जाणार नाहीत. २००९ ते २०१४ दरम्यान आपला देश भ्रष्टाचाराचे प्रतीक होता. म्हणून लोकांनी पंतप्रधान मोदींना मतदान केले आणि बदल घडला, असे ते म्हणाले. कायदा सर्व गुन्ह्यांना समानतेने हाताळतो. लोकशाहीत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली जातात. असे गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल केले जातात. आपली न्यायव्यवस्था राजकीय गुन्हे आणि सामान्य गुन्ह्यांमध्ये फरक करत नाही. त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांचा संदर्भ देताना फडणवीस म्हणाले, २०१६ मध्ये एका अहवालात असे म्हटले होते की, पोलिस तक्रारींचा सामना करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये मी ३५ खटल्यांसह पहिल्या क्रमांकावर होतो. त्यानंतर दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा क्रमांक लागतो. माझ्याविरुद्ध एकही खटला नैतिक अध:पतनाचा नव्हता. मी काहीही चुकीचे केले नव्हते. मी सार्वजनिक कारणांसाठी लढल्याचे ते म्हणाले.