कोल्हापूर – कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी थकीत रकमेत सुमारे 66 टक्के सवलत मिळविण्याच्या संधीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. आतापर्यंत या योजनेत पश्चिम महाराष्ट्रातील 6 लाख 45 हजार 812 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 1 लाख 94 हजार 381 शेतकऱ्यांनी थकबाकीमध्ये सुमारे 66 टक्के सवलत घेत संपूर्ण वीजबिल कोरे केले आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणकडून गावोगावी जनजागृतीपर शेतकरी मेळावे व संवाद मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना वीजबिलाबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी जाहीर केलेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, वीजबिलांतून थकबाकीमुक्ती व स्थानिक वीजयंत्रणेचे विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत कृषिपंपाच्या 35 हजार 619 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तर चालू व थकीत वीजबिल भरण्यातून ग्रामपंचायती व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी 33 टक्के असा एकूण 755 कोटी 88 लाख रुपयांचा आकस्मिक निधी जमा झाला आहे. या निधीमधील वीज यंत्रणेच्या स्थानिक कामांसाठी आतापर्यंत 202 कोटी 67 लाख रुपये खर्चाचे 5757 कामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहेत.
पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 6 लाख 45 हजार 812 शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीचे एकूण 929 कोटी 54 लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये या सर्व शेतकऱ्यांना भरलेल्या थकबाकीएवढीच 432 कोटी 30 लाख रुपयांची माफी तसेच निर्लेखन, व्याज व विलंब आकारातील सवलतीचे 1239 कोटी असे एकूण 1671 कोटी 30 लाख रुपयांची मूळ थकबाकीमध्ये सूट मिळाली आहे.