Ruturaj Gaikwad to lead Maharashtra : आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी २०२५-२६ साठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आपल्या १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गायकवाडने अलीकडेच दक्षिण आफ्रिका-ए विरुद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकत एकूण २१० धावांची खेळी साकारली होती. पृथ्वी शॉ आणि राहुल त्रिपाठी यांचा समावेश – या प्रतिष्ठित टी-२० स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा योग्य समतोल साधण्यात आला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून चांगली कामगिरी करणाऱ्या आणि मागील दोन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावणाऱ्या पृथ्वी शॉला त्याच्या चांगल्या फॉर्मचे बक्षीस मिळाले आहे. शॉसोबतच, आक्रमक फलंदाज राहुल त्रिपाठी आणि युवा अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. यष्टिरक्षक आणि गोलंदाजी फळी – महाराष्ट्र संघात दोन यष्टिरक्षक-फलंदाज निवडले गेले आहेत, ज्यामध्ये निखिल नाईक आणि मंदार भंडारी यांचा समावेश आहे. गोलंदाजी विभागात मुकेश चौधरी आणि अनुभवी जलज सक्सेना यांच्यासारख्या प्रभावी गोलंदाजांना संधी मिळाली आहे. तसेच, राजवर्धन हंगरगेकर, योगेश डोंगरे आणि रणजीत निकम यांच्यावरही निवड समितीने विश्वास दाखवला आहे. मात्र, या तिघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. हेही वाचा – Smriti Mandhana Video : स्मृती झाली ‘क्लीन बोल्ड’; पलाश मुच्छलने स्टेडियमवर केले रोमँटिक प्रपोज! पाहा VIDEO स्पर्धेचे वेळापत्रक – महाराष्ट्र क्रिकेट संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना २६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर जम्मू-काश्मीरविरुद्ध होणार आहे. तर, गट टप्प्यातील त्यांचा शेवटचा सामना ८ डिसेंबरला गोवा संघाविरुद्ध खेळवला जाईल. गट स्टेजमध्ये महाराष्ट्र एकूण सात सामने खेळणार आहे. हेही वाचा – IND vs SA : फक्त गिलच नाही तर ‘हा’ स्टार खेळाडू देखील दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-११ मधून होणार बाहेर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्राचा संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), पृथ्वी शॉ, अर्शिन कुलकर्णी, राहुल त्रिपाठी, अझीम काझी, निखिल नाईक (यष्टिरक्षक), रामकृष्ण घोष, विकी ओस्तवाल, तनय सांघवी, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, मंदार भंडारी (यष्टिरक्षक), जलज सक्सेना, राजवर्धन हंगरगेकर, योगेश डोंगरे, रणजीत निकम.