Suryakumar Yadav : ‘ट्रॉफीला स्पर्श करणं खूप छान वाटतं’, टी-२० मालिका जिंकल्यानंतर सूर्याने नक्वीला लगावला अप्रत्यक्ष टोला

‘ट्रॉफीला स्पर्श करून खूप आनंद झाला’
मालिका विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमारला विचारण्यात आले की, “अखेर टी-२० ट्रॉफी मिळाली, ट्रॉफीला स्पर्श करण्याची संधी मिळाली.” यावर भारतीय कर्णधाराने उत्तर दिले की, “ट्रॉफीला स्पर्श करून खूप आनंद झाला आहे. मला जेव्हा ही मालिका विजयाची ट्रॉफी देण्यात आली, तेव्हा मी ती माझ्या हातात अनुभवली.”
यादरम्यान, सूर्यकुमारने काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला संघाने जिंकलेल्या एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीची आठवण करून दिली. तो पुढे म्हणाला, “काही दिवसांपूर्वी आणखी एक ट्रॉफी भारतात दाखल झाली आहे. आपल्या महिला संघाने विश्वचषक जिंकला आहे. ती ट्रॉफीही घरी परत आली आहे. खूप आनंद वाटतोय आणि या (टी-२०) ट्रॉफीलाही स्पर्श करणे चांगले वाटत आहे.” सूर्यकुमारचे हे वक्तव्य नकवी यांच्यावरील टीका म्हणून पाहिले जात आहे.
पीसीबी-बीसीसीआयमधील अंतर कमी, लवकरच तोडगा –
दरम्यान, बीसीसीआय, पीसीबी आणि प्रमुख नकवी यांच्यातील अंतर कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी माहिती दिली की, आयसीसीच्या एका बैठकीदरम्यान अनौपचारिक चर्चा झाली आणि यावेळी दोन्ही बाजूंनी हा मुद्दा मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवण्यासाठी आणि लवकरच तोडगा काढण्यासाठी सहमती दर्शवली आहे.
हेही वाचा – IND vs AUS : वर्ल्ड कप 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाची कमान कोण सांभाळणार? मिचेल मार्शने दिले ‘हे’ उत्तर
आयसीसी बैठकीत नकवी उपस्थित
सैकिया यांनी पीटीआयला सांगितले की, “मी आयसीसीच्या अनौपचारिक आणि औपचारिक, दोन्ही बैठकांमध्ये उपस्थित होतो. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी देखील तिथे होते. ते पुढे म्हणाले, औपचारिक बैठकीदरम्यान हा विषय अजेंड्यावर नव्हता, परंतु आयसीसीने एका वरिष्ठ आयसीसी अधिकाऱ्याच्या आणि आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत माझ्यामध्ये आणि पीसीबी प्रमुखांमध्ये स्वतंत्र बैठक आयोजित केली.” त्यांनी पुढे सांगितले की, “संवादाची प्रक्रिया सुरू करणे खरोखरच चांगले होते. आयसीसी बोर्डाच्या बैठकीव्यतिरिक्त झालेल्या या बैठकीत दोन्ही बाजूंनी सौहार्दपूर्ण सहभाग घेतला. त्यांनी लवकरच कोणताही तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.”





