नगर -गेल्या वर्षीच्या जुलै- ऑगस्टपासून आता एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना ढगफुटी, दोन वेळा अतिवृष्टी, तर चार वेळा अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल 5 लाख 89 हजार 373. 47 हेक्टर क्षेत्रावरील 10 लाख 7 हजार 946 शेतकऱ्यांचे तब्बल 1 हजार 142 कोटी 58 लाखांचे नुकसान झाले. त्यापैकी राज्य शासनाकडून आत्तापर्यंत केवळ 166 कोटी 75 लाख रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे.
जून ते ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे 2 हजार 319.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. बाधित शेतकऱ्यांची संख्या 21 हजार 410 आहे. त्यासाठी 4 कोटी 25 लाख 91 हजार रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. त्यापैकी 4 कोटी 8 लाख 98 हजार रुपयांचे 21 हजार 119 शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले. 16 लाख 93 हजार रुपये पुन्हा विभागीय आयुक्तांकडे परत पाठवण्यात आले.
ऑगस्ट ते सप्टेंबर 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे 1 लाख 64 हजार 496.13 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यातील शेतकऱ्यांची संख्या 2 लाख 74 हजार 630 होती. त्यासाठी 366 कोटी 84 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैकी 162 कोटी 66 लाख 65 हजार रुपयांची रक्कम 1 लाख 34 हजार 85 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. ऑगस्ट ते सप्टेंबर 2022 मध्ये सततच्या पावसाने 3 लाख 93 हजार 575.93 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. बाधित शेतकऱ्यांची संख्या 6 लाख 56 हजार 473 होती. त्यासाठी 786 कोटी 96 लाख 29 हजार रुपयांची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली. हे अनुदान अद्याप मिळाले नाही.
मार्च 2023 मध्ये अवेळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीमुळे 6 हजार 36.77 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यातील शेतकरी संख्या 11 हजार 793 होती. त्यासाठी 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. हेही अनुदान अद्याप मिळालेच नाही. एप्रिल 2023 मधील 7 ते 16 एप्रिल या कालावधीत अवेळी पाऊस, वादळी वारे आणि झालेल्या गारपिटीमुळे 19 हजार 855.72 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यातील शेतकरी संख्या 34 हजार 458 होती.
त्यासाठी 34 कोटी 50 लाख रुपयांची मागणी केली. हेही अनुदान अद्याप मिळालेले आहे तर 20 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत अवेळी पाऊस, वादळी वारे, गारपीट यामुळे 490.10 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यातील शेतकऱ्यांची संख्या 9 हजार 182 आहे. त्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
आपत्तीमध्ये 10 जणांसह 50 जनावरांचा मृत्यू
या व्यतिरिक्त जून 2022 ते एप्रिल 2023 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे 10 मृत्युमुखी पडले, दोनजण जखमी झाले, 50 जनावरे मृत्युमुखी पडली तर नुकसान झालेल्या घरांची संख्या 1 हजार 112 आहे. त्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.