छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलिल यांचा तगडे आव्हान असणार आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
2019च्या आधी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी सलग चारवेळा खासदार म्हणून निवडून येण्याची किमया साधली होती. चंद्रकांत खैरेंनी बॅरिस्टर अंतुलेंपासून काँग्रेसच्या अनेक मातब्बरांना धूळ चारत या चारही निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलिल यांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता.
शिवसेनेने मुंबईबाहेर विस्तार करायचा ठरवला तेव्हा शिवसेनेच्या विचारांसाठी पोषक असणारी जमीन म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी याच शहराची निवड केली, महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी काँग्रेस सोडून स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली सभादेखील याच शहरात घेतली होती.
कधी शहराच्या तर कधी विद्यापीठाच्या नामांतरामुळे गाजलेला हा प्रदेश आता मात्र एका वेगळ्या राजकीय वळणावर येऊन उभा आहे. हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघातील मतदारांनी बापूसाहेब काळदाते यांच्यासारख्या समाजवादी नेत्यालाही दिल्लीला पाठवले होते.
2019आधी झालेल्या प्रत्येक निवडणुकीत चंद्रकांत खैरे विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी असा दुहेरी सामना पाहायला मिळाला होता. पण 2019च्या निवडणुकीत चौरंगी लढत झाली आणि मतदारांनी पहिल्यांदाच हिंदुत्वापेक्षा जात आणि इतर मुद्द्यांना महत्त्व दिले.
काँग्रेस, जनता पक्ष, शिवसेना आणि ऑल इंडिया मंजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) या सगळ्या पक्षांना संधी दिलेल्या औरंगाबाद लोकसभेच्या मतदारांनी अजूनही भाजपला मात्र एकदाही विजयी केलेलं नाही. अर्थात शिवसेना-भाजप युतीने मात्र सातवेळा विजय मिळवला आहे.
त्यामुळे अबकी बार चारसो पार असा नारा घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपसाठी या लोकसभेची निवडणूक महत्त्वाची असणार आहे. दुसरीकडे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनीही या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
2019 च्या निवडणुकीत काय घडले?
2019 मध्ये सलग चारवेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पहिल्यांदाच खासदारकी लढवणारे इम्तियाज जलील यांच्यात ‘कांटे की टक्कर’ होत होती. सुरुवातीपासूनच जलील आघाडीवर होते पण शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये चंद्रकांत खैरेंनी आघाडी घेतली आणि ही लढाई चुरशीची होणार हे स्पष्ट झाले.
अखेर पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या इम्तियाज जलील यांनी 4492 मतांनी चंद्रकांत खैरेंना धूळ चाखायला लावली. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांना सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली तर काँग्रेसचे सुभाष झांबड सुमारे नव्वद हजार मतं मिळवून चौथ्या क्रमांकावर राहिले.
मागील चार वर्षात काय घडले?
मागच्या चार वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे. हैदराबादच्या ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय संसार फार काळ टिकू शकला नाही. दुसरीकडे खासदारकी नसताना चंद्रकांत खैरे यांना मतदारसंघावर पकड कायम ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील जवळपास सगळेच महत्वाचे नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.
हे फॅक्टर निर्णायक ठरतील?
– राम मंदिर आणि इतर राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरतीलच पण मराठा आंदोलनाचा प्रभावही या निवडणुकीवर राहील.
– एक म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे ज्या गावात आंदोलन करत होते ते गाव औरंगाबाद शहरापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर आहे आणि दुसरं म्हणजे 2019 च्या निवडणुकीत मराठा चेहरा म्हणून पुढे आलेल्या हर्षवर्धन जाधव यांना मिळालेली सुमारे अडीच लाख मतं.
– या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची टक्केवारी 21 ते 22 टक्के एवढी आहे. तर अनुसुचित जाती- जमातीची संख्या 19 ते 20टक्के इतकी आहे.
– ठाकरे गट आणि भाजप यांच्यामुळे हिंदू मतांमध्ये विभागणी झाली तर पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना संधी मिळेल का?