हिंजवडी – पाच वर्षांपूर्वी लग्न झालेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन एका सुरक्षारक्षकाने तिचा निर्दयी खून केल्याची खळबळजनक घटना पुनावळे येथे घडली आहे. गौरी राहुल प्रतापे (वय 21, सद्या रा. नवनाथ बोरगे यांची चाळ, विजयनगर, माळवाडी, पुनावळे) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी घरमालक नवनाथ रामदास बोरगे (वय 32, रा. स्वराज प्राईड सोसायटी, माळवाडी, पुनावळे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरीचा पती राहुल गोकुळ प्रतापे (वय 30) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर तो अंधाराचा फायदा घेत फरार झाला. मात्र पोलिसांनी अवघ्या तासाभरातच त्याला जेरबंद करत गजाआड केले.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल हा पत्नी गौरी सोबत पुनवळ्यात भाड्याचे खोलीत राहत होता. तो सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करत असे. मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील घारगावचा रहिवासी असलेल्या राहुलचा बार्शी येथील गौरीशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नाला पाच वर्षे उलटून गेली तरी त्यांना मूलबाळ नसल्याने तो कायम गौरीच्या चारित्र्यावर संशयाने पाहायचा. त्यातून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. मंगळवारी रात्री पुन्हा त्यांच्यात भांडणे सुरू असताना बोरगे यांनी पाहिले असता ते आपल्या फ्लॅटमधून खाली गेले असता राहुलने गौरीला कोयत्याने मारून गंभीर जखमी केल्याचे त्यांनी पाहिले. या वेळी राहुलचा भाऊ संतोष हा देखील तिथे उपस्थित होता. रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेल्या गौरीला उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच ती मृत झाली असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.