Youth Congress Protest : पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! विषारी दारूकांडानंतर उत्पादन शुल्क कार्यालयावर युवक काँग्रेसचा हल्लाबोल
Youth Congress Protest : फुगेवाडी विषारी दारू मृत्यूकांडाच्या निषेधार्थ प्रदेश युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उत्पादन शुल्क कार्यालयासमोर तीव्र आंदोलन; दोन तासांच्या ठिय्यामुळे परिसरात तणाव.

Youth Congress Protest – विषारी दारू मृत्यूकांडाच्या पार्श्वभूमीवर प्रदेश युवक काँग्रेसने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. आंदोलनावेळी युवक काँग्रेसचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, प्रभारी गणेश उबाळे, शहराध्यक्ष सौरभ अमराळे, सरचिटणीस भूषण रानभरे, महेश म्हेत्रे, विश्वजीत जाधव, अथर्व सोनार, अभिषेक अवचर, निखिल मलके,
विकास सुपनार, विवेक कडू, सद्दाम शेख, रेहान बाबुडे आदी उपस्थित होते. विषारी दारू प्रकरणातील मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते. जवळपास दोन तास कार्यकर्ते आंदोलनस्थळी ठिय्या देऊन बसले होते.
दोषींना संरक्षण देणाऱ्या प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत होते. कार्यकर्त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना प्रवेश करण्यास मज्जाव केला. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
दोन तासांच्या आंदोलनानंतर युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे जिल्हा अधीक्षक अतुल कानडे यांची भेट झाली. शिष्टमंडळाने त्यांच्यासमोर विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. अवैध दारू व्यवसायाविरोधात तातडीने व कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान काही युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्या. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
केवळ अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करून काहीही साध्य होणार नाही. आतापर्यंत १९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंची जबाबदारी कोण घेणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अवैध दारू, हातभट्ट्या संबंधित अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालीच सुरू होत्या, हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहन सुरवसे – पाटील यांनी केली आहे.





