बेल्हे, (वार्ताहर)- शरद सोनवणे यांचा निर्वाणीचा इशारा : आळेफाटा येथे उपोषण उपवन संरक्षण अधिकारी अमोल सातपुते यांनी बिबट्याच्या समस्येवर शासनाशी कोणताही पत्रव्यवहार केलेला नसून त्यांना जनततेचे काहीही पडलेले नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी ५० ते ६० पोलीस घेऊन फिरत असतात.
त्यांना माणसाच्या जीवाची पर्वा नाही. त्यांच्यामुळे माणसांचा जीव गमवावा लागला आहे. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेतकऱ्यावर जे गुन्हे दाखल केले आहेत. ते मागे घेतले पाहिजेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत मी अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही, असा निर्वाणीचा इशाारा माजी आमदार शरद सोनवणे यांनी राज्य शासनाला दिला आहे.
बिबट्याचे माणसांवर दिवसेंदिवस हल्ले वाढतच चालले असून वनविभागाने यावर कुठल्याही प्रकारे ठोस पावले उचलली नाहीत तसेच बिबट विषयांवरील विविध मागण्यासाठी माजी आमदार शरद सोनवणे हे शुक्रवा (दि.२४) सकाळी दहापासून बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष सौरभ डोके, वडगाव आनंद गावचे माजी सरपंच प्रदीप देवकर, कोळशाची गावचे माजी सरपंच संजय गाढवे, निलेश शिंदे, दिगंबर घोडेकर, निलेश भुजबळ, बाजीराव कु-हाडे, गणेश गुंजाळ, संतोष घोटने आदी मान्यवर उपस्थित होते.
अमोल सातपुते यांना निलंबित करा
सोनवणे म्हणाले की जुन्नर तालुक्यात बिबट्याचे मानवावर तसेच पाळीव प्राण्यांवर दिवसेंदिवस हल्ले वाढतच असून यामध्ये दोन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू व पाचहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
वनविभागाने यावर कोणतीही ठोस पावले उचलली नाही. पिंपरी पेंढार या गावात एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व वन अधिकारी यांच्यात झालेल्या वादात काही ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले आहेत.
जुन्नरचे वनपरिक्षेत्र उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांना शासनाने तातडीने निलंबीत करावे, शासनाला जुन्नर, आंबेगाव खेड, शिरूर संवेदनशील बिबट क्षेत्र घोषीत करावी, हल्ला झालेल्या पिंपरी पेंढार, पिंपळवंडी उब्रंज, काठवाडी या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. ते तातडीने मागे घ्यावेत, आदी मागण्यांसाठी उपोषण सुरू ठेवणार आहोत, असे सोनवणे यांनी यावेळी सांगितले.