भारतीय संघाला टी-20 विश्वचषकातील सेमीफायनल सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवासह भारत विश्वचषकातून बाहेर पडला. यानंतर मात्र भारतीय क्रिकेट चाहत्यांनी देखील टीम इंडियावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. दरम्यान, दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने टी-20 विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाची कामगिरी चांगली राहिली नाही, मात्र ती हार स्वीकारून भारतीय संघाला साथ दिली पाहिजे, असे सचिन म्हणाला.
ऍडिलेडच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 16 षटकांत एकही विकेट न गमावता 170 धावा केल्या होत्या. रविवारच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा सामना मेलबर्नमध्ये पाकिस्तानशी सुरु आहे. इंग्लंडच्या जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. भारताच्या गोलंदाजांना इंग्लंडची एकही विकेट घेता आली नाही.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. या पराभवानंतर भारतीय संघावर बरीच टीका होत आहे. यावेळी ‘आपण संघाला पाठिंबा दिला पाहिजे’ असे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. एएनआयशी बोलताना सचिन म्हणाला की, “मला माहित आहे की इंग्लंडविरुद्धचा सेमीफायनल सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खूपच निराशाजनक होता. भारतीय संघाने धावा कमी केल्या हे मान्य करावे लागेल. ऍडिलेडमध्ये १६८ ही धावसंख्या मोठी नाही, कारण या मैदाच्या बाजूच्या सीमा लहान आहेत. त्याचबरोबर संघाच्या गोलंदाजांना इंग्लंडचे गडीही बाद करता आले नाहीत. भारतासाठी हा खूप कठीण सामना होता. आपल्याला खूप वाईट आणि निराशाजनक पराभव मिळाला.”
सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला की, “पहिला क्रमांक मिळवण्याचे काम एका रात्रीत होऊ शकत नाही. संघाला चांगले क्रिकेट खेळावे लागेल. या खराब कामगिरीच्या आधारे आपण आपल्या संघाला दोषी ठरवू नये. खेळामध्ये हार-जीत ओह असते, त्यामुळे आपण आपल्या संघाला साथ दिली पाहिजे.”