संतोष पवार –
सातारा – एप्रिल महिना अर्धा संपत आला असला, तरी अद्याप जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा एकही टॅंकर सुरू नाही. विशेष म्हणजे दरवर्षी दुष्काळी तालुक्यातून टॅंकरची मागणी होत असते. यावर्षी अद्याप एकाही टॅंकरची मागणी नाही. जिल्ह्यातील एप्रिल ते जून महिन्याचा संभाव्य पाणीटंचाई एक कोटी 22 लाख 22 हजार रुपयांचा कृती आराखडा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. जिल्ह्यातील 118 गावे व 228 वाड्यावस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. यावर्षी फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता जाणवू लागली असली, तरी अद्याप टॅंकरची मागणी नसल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
माण, खटाव, कोरेगाव, फलटण या तालुक्यांमधून पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची मागणी मार्चपासून होत असते. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग नियोजन करतो. यावर्षीही पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला आहे; परंतु दुष्काळी तालुक्यातील गावांमधून टॅंकरची मागणी झालेली नाही. या तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने भूजल पातळी समाधानकारक आहे.
पाणीपुरवठा विभागाने 1 एप्रिल ते 30 जूनअखेर संभाव्य पाणीटंचाई आराखडा बनवला आहे. माण तालुक्यात 16 गावे व 59 वाड्यांना 16 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी 14 लाख 40 हजार रुपये, खटाव तालुक्यात 12 गावे व 16 वाड्यांना सात टॅंकरने पाणीपुरवठा व 11 खासगी विहिरी अधिग्रहणासाठी दहा लाख 26 हजार,
कोरेगाव तालुक्यात चार गावांना पाणीपुरवठा व चार खासगी विहिरी अधिग्रहणासाठी एक लाख 44 हजार, खंडाळा तालुक्यात पाच गावे व एका वाडीत सहा टॅंकरने पाणीपुरवठा व दोन खासगी विहिरी अधिग्रहणासाठी सहा लाख 12 हजार, फलटण तालुक्यात 11 गावे व एका वाडीत 12 टॅंकरने पाणीपुरवठा व सात खासगी विहिरी अधिग्रहणासाठी 13 लाख 32 हजार, वाई तालुक्यात 23 गावे व 17 वाड्यांना 14 टॅंकरने पाणीपुरवठा व 30 खासगी विहिरी अधिग्रहणासाठी 23 लाख 40 हजार, पाटण तालुक्यात 19 गावे व 13 वाड्यांना 21 टॅंकरने पाणीपुरवठा व तीन खासगी विहिरी अधिग्रहणासाठी 19 लाख 98 हजार, जावळी तालुक्यात चार गावे व 12 वाड्यांना 15 टॅंकरने पाणीपुरवठा व एक खासगी विहीर.
अधिग्रहणासाठी 13 लाख 86 हजार, महाबळेश्वर तालुक्यात चार गावांना चार टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी 3 लाख 60 हजार, सातारा तालुक्यात सहा गावे व आठ वाड्यांना 11 टॅंकरने पाणीपुरवठा व तीन खासगी विहिरी अधिग्रहणासाठी दहा लाख 98 हजार रुपये, कराड तालुक्यात सात गावे व एका वाडीत पाच टॅंकरने पाणीपुरवठा व एक खासगी विहीर अधिग्रहणासाठी चार लाख 86 हजार रुपये संभाव्य खर्च येणार आहे.
पाणलोटमधून जिल्ह्यात झालेली कामे, जलसंधारणाला दिलेले प्राधान्य, कालव्यांची कामे, यामुळे गेल्या दोन वर्षांत पाणीटंचाई फारशी भेडसावत नाही. संभाव्य गावे, वाड्यावस्त्यांचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. पाणीटंचाई जाणवत असलेल्या गावात “जलजीवन मिशन’ अंतर्गत प्राधान्याने कामे केली जात आहेत. ज्या गावची मागणी येईल, त्याठिकाणी टॅंकर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
<b>- सुनील शिंदे,
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.</b>