Varun Gandhi : भारतीय जनता पार्टीचे पीलीभीत येथील खासदार आणि गांधी- नेहरू घराण्यातील वारस वरूण गांधी हे यंदाची निवडणूक पीलीभीतऐवजी अमेठी मतदारसंघातून लढणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र खुद्द वरूण यांनी त्याचा इन्कार केला आहे. आपण तेथून लढणार नसल्याचे त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
यंदा भाजपकडून वरूण यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर ते गांधी- नेहरू घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात आणि उत्तर प्रदेशातील कॉंग्रेस- समाजवादी पक्षाची आघाडी त्यांना बाहेरून पाठिंबा जाहीर करेल अशी रणनीती ठरली असल्याच्या बातम्या होत्या. मात्र तसे काही होणार नसल्याचे वरूण यांनी स्पष्ट केले आहे.
वरूण यांनी गेल्या काही काळापासून आपल्याच भाजप या पक्षाच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. ते आपल्यासाठी पर्याय शोधत असल्याच्याही बातम्या होत्या. मध्यंतरी त्यांनी त्यांच्या आजी अर्थात इंदिरा गांधी यांचीही प्रशंसा केली होती.
कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांनी आजीची प्रशंसा करण्यात गैर काही नाही मात्र वरूण यांची विधाने एका मालिकेतील असल्यासारखी आणि भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करणारी होती. त्यामुळे भाजपच्या गोटात त्यांच्याबद्दल संशय निर्माण झाला नसेल तरच नवल होते. त्या पाश्र्वभूमीवर आता त्यांनी अमेठीचा इन्कार केला आहे. मात्र तरीही भाजपडून उमेदवारी मिळाली नाही तर पुढे काय हे अद्याप अनुत्तरीत आहे.