कोलकता – तृणमूल कॉंग्रेस हा एक दहशतवादी पक्ष असून त्यांचे नेते माफिया आहेत. हे कमी की काय, हा पक्ष भ्रष्टाचारानेही पोखरलेला आहे. बंगालमध्ये पंतप्रधान घरकुल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता घडली आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केला आहे.
नड्डा म्हणाले की, भाजप ममता बॅनर्जींचे जंगलराज संपवेल जिथे दररोज हिंसाचार होत असतो. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान घरकुल योजनेचे ऑडिट केले गेले असल्याने मोठ्या प्रमाणात अनियमितता समोर आली आहे. यावरून स्वत:ची आधीच दोन-तीन मजली घरे असलेल्या लोकांना या योजनेंतर्गत घरे मिळाल्याचे दिसून आले.
महिला मुख्यमंत्री असतानाही पश्चिम बंगाल महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या बाबतीत श्रेष्ठतम पातळीवरआहे, असे सांगून नड्डा म्हणाले की, टीएमसी म्हणजे दहशत, माफिया आणि भ्रष्टाचार (टेररिझम, माफिया, करप्शन). पश्चिम बंगालमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार आहे. एसएससी भरती असो किंवा इतर कोणत्याही प्रकारची भरती असो, नोकऱ्या विकल्या जातात.
जेपी नड्डा म्हणाले की, ठिक आहे; आम्ही येथे सरकार बनवू शकलो नाही. काही हरकत नाही. पुढच्या वेळेची तयारी करा, पुढच्या वेळी इथे नक्की सरकार स्थापन करू. मोदीजींनी बंगालशी कधीही भेदभाव केला नाही. मोदीजी बंगालला पुढे नेण्यासाठी समर्पित आहेत, असेही नड्डा शेवटी म्हणाले.