नवी दिल्ली – अग्निपथ योजनेच्या समर्थनार्थ सरकारने लष्कराच्या तिन्ही दलांतील प्रमुखांना मैदानात उतरवले आहे. सरकारच्या बचावासाठी लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांचा अशा प्रकारे वापर करण्याचा प्रकार गेल्या 75 वर्षात पहिल्यांदाच घडला आहे, असे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटले आहे.
काल रविवारी लष्कराच्या तिन्ही दलांच्यावतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यात अग्निपथ योजनेचे समर्थन केले गेले होते. त्या संबंधात खरगे यांनी हा आरोप केला.
त्यापुर्वी या योजनेच्या संबंधात तिन्ही दलांच्या प्रमुखांची संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याशीही दोनवेळा बैठका झाल्या आहेत. लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांवर प्रथमच ही वेळ आली असून त्यांना सरकारच्या चुकीच्या योजनेचा बचाव करावा लागत आहे असे ते म्हणाले. पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री या योजनेवर मूग गिळून का गप्प आहेत असा सवालही खरगे यांनी केला आहे.