पिंपरी, दि. 9 – निगडी येथील टिळक चौक हा रहदारीचा चौक आहे. या चौकात नित्याची वाहतूक कोंडी पहायला मिळते. येथे मोठी वसाहत असून, याच चौकातून तळवड, चाकण औद्योगिक वसाहतीकडे हे रस्ते जातात. वाढते औद्योगिकीकरण आणि बेशिस्त वाहन चालक आणि नियोजनाचा अभाव यामुळे वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख चौकांमध्ये कोंडीची समस्या बिकट होत चालली आहे. निगडी येथील टिळक चौक हा रहदारीचा चौक आहे. या चौकातून तळवडे, प्राधिकरण, चिंचवड, देहूरोडकडे जातो. त्यामुळे या चौकात सतत वाहनांची वर्दळ असते. तसेच या चौकाच्या परिसरात अनेक खासगी बस उभ्या केलेल्या असतात. काही ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसही उभ्या असतात. परिणामी कोंडीत भर पडते. या चौकात पीएमपीचा बस थांबाही आहे. त्यामुळे येथे बससाठी येणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते. प्रवासी, बस आणि इतर ये-जा करणारे नागरिक यांच्यामुळे कोंडी होत आहे.
सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. टिळक चौकातील वाहतूक कोंडीवर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. परिसरातील कार्यकर्ते व युवकांनी अनेकदा वाहतूक विभागाकडे वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याचे निवेदने दिली आहेत. मात्र, त्यावर कसलीच कार्यवाही होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत.