नवी दिल्ली – भारतातील नागरिकांना एसयूव्ही या प्रवासी कारचे आकर्षण आहे. त्यामुळे एकूण वाहन विक्रीत एसयुव्ही वाहनांचा वाटा सध्या 60 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांदरम्यान मोठी स्पर्धा निर्माण होत असल्याचे वातावरण आहे.
बहुतांश कंपन्या एसयूव्ही प्रकारचे वाहन तयार करत आहेत. एवढेच नाही तर या वाहनांमध्ये निरंतर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भात टाटा मोटर्स या कंपनीने म्हटले आहे की, एकूण बाजाराचा विचार केल्यानंतर आम्ही एसयूव्ही वाहनावर लक्ष केंद्रित केले असून विक्री कायम ठेवण्यासाठी वाहनामध्ये निरंतर सुधारणा करण्यात येत आहेत.
एसयूव्ही म्हणजे स्पोर्टस युटीलिटी व्हेईकल्स गेल्या पाच वर्षापासून भारतीय बाजारात इतर वाहनांच्या तुलनेत जास्त विकली जात आहेत. संदर्भात बोलताना टाटा मोटर्सचे प्रवासी वाहन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी सांगितले की, एसयूव्ही वाहनांच्या काही सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स आघाडीवर आहे. इतर सेगमेंटमध्येही टाटा मोटर्सने आघाडीवर राहावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
एसयूव्ही क्षेत्रात पहिल्या चार कंपन्यादरम्यान तीव्र स्पर्धा आहे. या कंपन्यांच्या विक्रीत फारसा फरक नाही. आमची बहुतांश मॉडेल चांगल्या प्रमाणात विकली जात आहेत. त्याचबरोबर 2024 आणि 25 मध्ये आम्ही आणखी दोन एसयूव्ही मॉडेल भारतात उपलब्ध करणार आहोत. आम्ही कारच्या सुरक्षिततेबाबत कसलीही तडजोड करत नाही.
आमच्या कारना चांगले रेटिंग मिळत आहे. टाटा सफारी आणि हॅरियर या कंपन्यांना 5 स्टार रेटिंग मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या जागतिक संस्थाकडून रेटिंग करून घेतले जात होते. मात्र आता भारतातही हे रेटिंग उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जगातील बहुतांश कार कंपन्या भारतात उत्पादन करीत आहेत. त्यातील अनेक कंपन्यांनी एसयूव्ही प्रकारातील वाहने भारतात उपलब्ध केली आहेत. या कंपन्याकडून भारतातील बाजारपेठेत विविध उत्पादने सादर करण्याबरोबरच जागतिक बाजारातही उत्पादने सादर केली जाते जात आहेत.