खालापूर, (वार्ताहर) – वनखात्याच्या परवानगी आभावी ताकई रस्त्याचे काम अनेक वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे. परंतु महिनाभरापूर्वीच वनखात्याने डांबरीकरणासाठी परवानगी दिली आहे. तरीही ठेकेदार काम सुरू करीत नसल्याने ताकई ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले आहेत.
खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई रस्त्याचे काम अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. मागील काळात अनेक प्रशासन अधिकारी बदलले, ठेकेदार बदलले आणि नागरिकांच्या समाधानासाठी धुमधडाक्यात भूमिपूजनही झाले. ताकई गाव ते बाँझर सोसायटी पर्यतचा रस्ता पूर्ण झाला आहे.
मात्र पुढील ३०० ते ४०० मीटर रस्ता वनखात्याच्या हाद्दीतून असल्याने काम करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे नागरिकांना खड्यातून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत होती.
नगरपालिकेला महिनाभरापूर्वी वनखात्याने डांबरीकरणासाठी परवानगी दिली असतानाही ठेकेदार काम सुरू करीत नसल्याने ताकई ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला.
मंगळवारी (दि. २) बांधकाम अभियंता आणि संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी जाब विचारला आहे. याप्रसंगी जयवंत पाटील, किसन पाटील, राकेश पाटील, डॉ. निकेश पाटील, संजय पाटील, राकेश पाटील, दिनेश पाटील, मंदार पाटील, बाँझर सोसायटीचे अध्यक्ष समीर देवकर उपस्थित होते. बांधकाम अभियंता अनिल वाणी यांनी कामबाबतची माहिती ग्रामस्थांना देत एप्रिल महिनाअखेरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले आहे.