सोलापूर – केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून राजकारणाचे सूडनाट्य सुरु झाले आहे. पण या गोष्टी मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. तसेच क्रियेला प्रतिक्रिया देण्यातही मर्यादा पाळली पाहिजे, असे मत व्यक्त करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी प्रत्यक्षपणे भाजप-सेनेला खोचक टोला लगाविला. तसेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय प्रश्नात बोलणे टाळावे, असाही सल्ला त्यांनी दिला.
जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र कायम सर्वांचा आदर करून काम करणारे राज्य आहे. सर्वांनी टोकाची भाषा बोलणे टाळले पाहिजे. सध्या राजकारणात दुसऱ्याचा सूड उगवणे हा नवा प्रकार दिल्लीतील नवे सरकार आल्यापासून सुरु झालेला आहे. त्यामुळे क्रिया-प्रतिक्रिया जास्त उमटायला लागल्या आहेत. दोन्ही बाजूने त्या मर्यादित ठेवल्या पाहिजेत आणि सार्वजनिक मर्यादांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात सध्या भाजप-सेना असा संघर्ष सुरू आहे. यामध्ये ठाकरे-राणे आणि संजय राऊत-किरिट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर जयंत पाटील यांनी अतिशय मार्मिक शब्दात वार करताना सार्वजनिक मर्यादांचे उल्लंघन करू नये, असा मोलाचा सल्ला दिला आहे.
पटोलेंनी माहिती घेऊन बोलावे
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती घेऊन बोलावे. राष्ट्रीय प्रश्नाबाबत राष्ट्रीय नेत्यांना बोलू द्यावे. आपण स्थानिक असून आपल्याला दुसऱ्या राज्यातील परिस्थिती फारशी माहित नसते. याशिवाय ही बैठक कॉंग्रेसला धरून आहे कि सोडून आहे हेही माहित नसते, असे म्हणत जयंत पाटलांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यानंतर पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.