पुणे – मार्चपासून राज्यातील शाळा बंद होत्या. त्यानंतर अनलॉकदरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात सर्वप्रथम 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले.
मात्र, सुरवातील करोना भीतीमुळे पालकांकडून मुलांना शाळेत पाठवण्यास नकार देण्यात येत होता. मात्र, आता विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. सद्य:स्थितीत 12.3 टक्के एवढी शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.
करोना पार्श्वभूमीवर 15 जूनपासून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यात आले होते. त्यानंतर 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात आले. यादिवशी केवळ 35.3 टक्के शाळा सुरू झाल्या. त्यातील 5 टक्केच विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. आता 67.5 टक्के एवढ्या शाळा सुरू झाल्या असून त्यातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतही वाढ होत आहे.
राज्यात नववी ते बारावीच्या 22 हजार 204 शाळा असून त्यात 56 लाख 48 हजार 28 विद्यार्थी संख्या आहे. पहिल्या दिवशी एकूण 9 हजार 127 शाळा सुरू झाल्या असून 2 लाख 99 हजार 193 विद्यार्थी उपस्थित होते. आता 11 हजार 322 शाळा सुरू झाल्या असून 4 लाख 91 हजार 962 विद्यार्थी उपस्थित आहे.