नगर – गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असून केवळ ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर किड व आळीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. परिणामी उत्पादन कमी होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. पाऊस नसल्याने शेतकरी रोपाला आलेली पिक वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असतांना दुसरी किड व अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. किड व अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता औषधांचा मारा सुरू केला असून त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत.
जिल्ह्यात या ऑगस्ट महिन्यात केवळ 7 टक्केच पाऊस झाला आहे. जुन महिन्यात सरासरी 108.20 मिमी पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात 58 मिमी पाऊस झाला. जुलै महिन्यात मात्र पावसाने काहीसी कसर भरू काढली. या महिन्यात सरासरी 97.5 मिमी पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात 111.4 मिमी पाऊस झाला. त्यामुळे खोळंबलेल्या खरीपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या. कृषी विभागाने यंदा खरीपासाठी 5 लाख 79 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. मात्र आता तब्बल 6 लाख हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. सुमारे 103.49 टक्के पेरण्या झाल्या. मात्र आता पावसाने चांगलीच ओढ दिली आहे.
चालू ऑगस्ट महिन्यात तुरकळ स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीपाचे पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशात आता पिक वाढीला लागले असतांना किड व आळ्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळे या प्रादुर्भाव वाढत आहे. मका, तूर, मूग, उडीद, सोयबीन, कापसू या सर्वच पिकांवर किड अन् अळी प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा औषधांवरील खर्च वाढला आहे.
भात पिकाचे सरासरी क्षेत्र 17 हजार 275.60 हेक्टर असून 13 हजार 864 हेक्टर क्षेत्रावर रोपे लावणी पूर्ण झाली आहे. ज्वारी 45 हेक्टरवर पेरणी झालेली असून पिक वाढीच्या अवस्थेत आहे. बाजरी 76 हजार 881 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या पिक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. मकाची 74 हजार 976 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून पिक वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र काही भागात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
तूरीचे क्षेत्र वाढले आहे. 36 हजार 104 हेक्टर सरासरी क्षेत्र असून 56 हजार 508 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पिक वाढीच्या अवस्थेत असून फांद्या फुटण्याच्या अवस्थेकत आहे. मात्र काही ठिकाणी शेंड्याची पाने गुंढाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेंडे खुडल्याचे दिसून येते. मूगचे क्षेत्र कमी झाले आहे. 47 हजार 36 हेक्टर सरासरी क्षेत्र असतांना केवळ 20 हजार 150 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शेंगा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिक असून पावसाने ओढ दिल्याने मावा किड लागली आहे. उडीदची 45 हजार 178 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून फुलोरा व शेंगा लागण्याची अवस्था आहे. जामखेड तालुक्यात 4 ते 5 ठिकाणी खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
सोयाबीनचे क्षेत्रा मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. 87 हजार 330 हेक्टर सरासरी क्षेत्र असतांना 1 लाख 63 हजार 248 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. पिक फुलोरा अवस्थेत असून काही भागात पानावर रस शोषणारी किड व अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कापूस पिकाचेही क्षेत्र वाढले आहे. सरासरी 1 लाख 22 हजार 86 हेक्टर क्षेत्र असतांना ते आता 1 लाख 39 हजार 900 हेक्टर झाले आहे. फांद्याचे फुटवे व पाते लागण्याच्या अवस्थेत पिक असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेंडे खुडल्याचे दिसत आहे. त्यामुळे या पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे.