मुंबई – राज्याचे नवे कृषी आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची जलसंधारण सचिव म्हणून बदली झाली आहे. गेडाम यांनी अतिशय कार्यक्षम आणि धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे.
डॉ. गेडाम यांचा वाळू उपसा रोखणारा सोलापूर पॅटर्न अतिशय गाजला होता. त्यांनी उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, जळगाव, नाशिकसह विविध शहरात काम केले आहे. अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. जळगावातील घरकुल घोटाळ्यात सुरेशदादा जैन यांच्यासह अनेक नेत्यांना गेडाम यांच्या खंबीर भूमिकेमुळे जेलची हवा खावी लागली आहे.
नाशिकमधील बिल्डर लॉबीच्या मनमानीलाही त्यांनी चाप लावला होता. जनताभिमुख प्रशासन ही त्यांची कार्यशैली पंतप्रधानांनाही भावली आहे. दरम्यानस, सुनील चव्हाण यांची गेल्यावर्षीच 22 नोव्हेंबर रोजी कृषी आयुक्त पदावर बदली करण्यात आली होती.
मात्र, अवघ्या वर्षभराच्या आत त्यांना या पदावरून मंत्रालयात हलविण्यात आले आहे. त्यांना कृषी आयुक्तपदाचा कार्यभार तातडीने सोडून त्वरित मंत्रालयातील मृद व जलसंधारण विभागाच्या सचिव पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी राहिलेले चव्हाण यांची 14 ऑक्टोबर रोजी असंघटित कामगार उपायुक्त (मुंबई) या साईड पोस्टवर बदली झाली होती. पण अवघ्या दीड महिन्यातच चव्हाण यांची पुन्हा बदली झाली असून त्यांच्याकडे आता राज्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कृषी आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आग्रहाने त्यांची ही पदावर बदली घडवून आणली होती. जिल्हाधिकारी असताना चव्हाण यांचा औरंगाबादेत सार्वजनिक वर्तुळात मोठ्या प्रमाणावर वावर होता.