नवी दिल्ली- कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आता लोकसभेची निवडणूक लढणार नाहीत. त्यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला असून कालच त्यांनी राजस्थानातून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्जही दाखल केला. या घटनेकडे त्यांनी रायबरेली या आपल्या लोकसभा मतदारसंघातून राजकीय निरोप घेतला असेही पाहिले जाते आहे. त्यांचे रायबरेलीशी असलेले निवडणुकीचे नाते आता संपुष्टात आल्याचेही म्हटले जाते आहे. त्या पाश्र्वभूमीवर सोनिया गांधी यांनी येथील नागरिकांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. नेहरू- गांधी घराण्यातील कोणीही व्यक्ती रायबरेलितून निवडणूक लढवणार नाही असे संकेतही त्यांनी या पत्रातून दिले आहेत.
रायबरेलिच्या जनतेला भावनिक आवाहन करत त्यांनी लिहिले आहे की तुम्ही ज्याप्रमाणे आजपर्यंत सांभाळले त्याचप्रमाणे यापुढेही प्रत्येक अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना सांभाळून घ्याल याची मला खात्री आहे. लवकरच तुम्हाला भेटण्याचा मी शब्द देते. दिल्लीतील माझे कुटुंब अपूर्ण आहे. जेंव्हा मी रायबरेलिला येते आणि तुमची भेट घेते तेंव्हाच माझे कुटूंब पूर्ण होते.
रायबरेलिशी हे नाते खूप जुने आहे आणि माझ्या सासरकडून सौभाग्य म्हणून ते मिळाले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत माझे सासरे फिरोजजी गांधी यांना पहिल्यांदा निवडून तुम्ही लोकसभेवर पाठवले. त्यानंतर माझ्या सासू इंदिरा गांधी यांनाही तुम्ही आपलेसे केले.
आयुष्यात कितीही उतार-चढाव आले, मार्गात कितीही अडचणी आल्या तरी तेंव्हपाासून आपले हे नाते अत्यंत प्रेमाने आणि तेवढ्याच उत्साहाने पुढे गेले. त्यावरची आमची श्रध्दाही दृढ होत गेली. याच प्रकाशमान रस्त्यावरून जाण्याची जागा तुम्ही मलाही दिली.
सासू आणि आपल्या जिवनसाथीला कायमचे गमावल्यानंतर मी तुमच्याकडे आली आणि तुम्ही मला पदरात घेतले. गेल्या दोन निवडणुकांतही तुम्ही अढळपणे माझ्यासोबत उभे राहीलात, हे मी कधीच विसरू शकत नाही. आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे हे सांगण्यास मला अभिमान वाटतो आणि या विश्वासास पात्र ठरण्याचा मी कायमच प्रयत्न केला.
वय आणि आरोग्य यामुळे ही लोकसभा निवडणूक मी लढवणार नाही. या निर्णयामुळे तुमची सेवा करण्याची थेट संधी मला मिळणार नाही मात्र माझे मन आणि प्राण सदैव तुमच्यासोबत राहील हे निश्चित.