का-हाटी, (वार्ताहर) – बारामती तालुक्यात ग्रामीण भागात स्मार्ट फोनमुळे विद्यार्थी व युवा पिढीतील वाचनाची गोडी कमी झाल्यामुळे तालुक्यातील वाचनालयात युवा पिढीचा शुकशुकाट दिसून येतो. एखादा दुसरा ज्येष्ठ नागरिक वाचनालयातील पुस्तके चाळताना दिसत असल्याने वाचन संस्कृती लोप पावत चालल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याच्यामुळे वाचक समृद्ध होतो. ग्रंथ मानवी आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रंथ हेच खरे गुरू असल्याचे म्हटले जाते; परंतु सध्याच्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियामुळे ग्रंथांऐवजी मोबाइल, इंटरनेट तरुणांचे गुरू झाल्याचे दिसून येत असून, वाचनालयाकडे मुलांचा व तरुणाईचा ओढा कमी झाला आहे.
तरुणाइचा पुस्तकांऐवजी मोबाइल व अन्य साधनांकडे कल वाढल्याने स्मार्टफोनच्या युगात शहरातील सार्वजनिक वाचनालयात ज्येष्ठ नागरिकांचीच वर्दळ अधिक दिसून येते. वाचनालयात नव्या पिढीचे दर्शन फारच दुर्मीळ झाले आहे.
स्पर्धा परीक्षांची मोजकीच मुले
स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या अनेक उमेदवारांना विविध विषयांवरील पुस्तकांचा आढावा घ्यावा लागतो. यासाठी लागणारी पुस्तके सहज उपलब्ध होत असतात. तरीही या सोशल मीडियाच्या दुनियेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी बारामती तालुक्यातील मोजकीच मुले वाचनालयाची वाट पकडताना पहायला मिळत आहेत. जे विद्यार्थी
खासगी करिअर अकॅडमीच्या मागणी
पुस्तकांचा वापर करतात त्यात बहुतांश तरुण खासगी करिअर अकॅडमीची मागणी अभ्यास करतात. त्यामुळे आजच्या तरुणांनी वाचनालयांकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की खेळ खेळणे, मामाच्या गावाला जाणे, मौजमस्ती करणे, पोहणे, सायकल चालवायला शिकणे, दिवसातून तासभर वेळ काढून वाचनालयात जाऊन कादंबरी, महापुरुषांच्या कथा वाचन करणे आदी कार्यक्रम ठरलेले असायचे. पण काळानुरूप यात बदल झाला.
संगणक व मोबाइलचे युग आले. मुले तासन्तास मोबाइलचा वापर करू लागली. याशिवाय टीव्ही, नेट कॅफेवर अनेक मुले बसलेले दिसून येतात. त्यामुळे वाचनालयाकडे येणारी तरुण पिढीची पावले आता सायबर कट्ट्यावर स्थिरावल्याने वाचाल तर वाचाल ही संस्कृतीच आता काळाच्या ओघात मागे पडते की काय अशी चिंता आहे. – के. के. वाबळे, सेवानिवृत्त प्राचार्य