फलटण – एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आहे खरी! उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आहे बरी, अशी कविता करत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद आणि राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये एका जागेची रिपाईने केलेली मागणी नक्की पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
दलित पॅंथरचे कार्यकर्ते दिवंगत चंद्रकांत अहिवळे यांच्या शोकसभेसाठी आठवले फलटणला आले होते. शोकसभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, रिपाई पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, विजय येवले, मुन्ना शेख, राजू मारुडा, संजय निकाळजे, अभिलाष रवींद्र काकडे, सतीश अहिवळे, लक्ष्मण अहिवळे, बाबा लोंढे, सागर लोंढे उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “”एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे अत्यंत चांगले काम करेल, लवकरच पावसाळी अधिवेशन होणार आहे आणि त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. रिपब्लिकन पक्षाला या मंत्रिमंडळात एक मंत्रिपद मिळावे अशी मागणी केली आहे, त्याचबरोबर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी एक जागाही रिपाईला मिळावी, अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नक्कीच या मागणीचा विचार करून आम्हाला न्याय मिळेल. सध्या खरी शिवसेना कोणती आणि निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार असा प्रश्न उभा आहे, परंतु आम्हाला अपेक्षा आहे की, 40 आमदार एका बाजूला आणि 15 आमदार दुसऱ्या बाजूला, 12 खासदार एका बाजूला आणि 6 खासदार दुसऱ्या बाजूला, अशा पद्धतीने टू थर्ड मेजॉरिटी ही एकनाथ शिंदे गटाकडे आहे, त्यामुळे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह, एकनाथ शिंदे गटालाच मिळेल.
” बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचे असेल, तर आपण भाजपसोबत यावे, असे मी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. परंतु त्यांनी त्याला फार वेळ लावला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे बंड झालं, असे आठवले यांनी स्पष्ट केले.