पारनेर – पारनेर आगाराचे सांडपाणी मुख्य रस्त्यावर साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, आगार व्यवस्थापकांनी वेळीच दखल घेऊन या सांडपाण्याची निचरा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पारनेर आगार अस्वच्छतेबाबत अनेकदा आवाज उठवूनही आगाराची जैसे थी परिस्थिती आहे. त्यात अजून एक भर म्हणजे पारनेर आगाराचे सांडपाणी थेट पारनेर-सुपा रस्त्यावर साचत आहे. रस्त्यावरून जाणारे वयोवृद्ध, महिला, पुरुष, लहान मुले, मुली, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना या साचलेल्या पाण्याचा घाण वास येत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याच वेळेस हेच घाण पाणी एखादे वाहन त्यातून गेले तर नागरिकांच्या अंगावर उडते.
या सांडपाण्यामुळे रस्त्यालगत असणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना या सांडपाण्याचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी नाक दाबून जावे लागते. पारनेर आगाराच्या या ढिसाळ कारभाराबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पाण्यामुळे डासांना अंडी घालायला जागा मिळते. हेच डास चावल्याने लोकांना मलेरिया, डेंग्यूसारखे साथीचे रोग होतात. या कारणांमुळे आगार व्यवस्थापकांनी सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.